Wednesday, August 26, 2020

मांडावरचं झाड

 मांडावरचं झाड  


       दहा-बारा  वर्षापूर्वीची गोष्ट. रात्रीचे जेवण आटोपले होते. शतपावलीसाठी अंगणात  मी फे-या मारत होतो. इतक्यात शेजारच्या दादाने साद घातली , "गुरुजींनु जेवण झालं काय?  आज मांडावर बायांची गाणी आहेत. बघायला येता काय?"


मी म्हणालो,  "बायांची गाणी  म्हणजे काय असतं  हो. अहो लावणी वगैरे आहे की काय?"


"अहो  तसं नाय.तिथे मांडावर  बायांच्या अंगात देवी येते. अंगात झाड भरते.म्हादा  गाणी गातो.तुम्हाला माहीत नसलं तर बघायला तरी चला." दादा म्हणाला.


"मी कधी पाहिलं  नाही  बघू थोडा वेळ झोप येताच परत येऊ. "असं म्हणून  मी हातात  छोटी टॉर्च घेऊन  दादा सोबत निघालो. तो पर्यंत ढोलकीचा व टाळांचा आवाज  घुमू लागला होता. 


       आम्ही शिरीच्या घरा जवळ पोहचलो. प-याच्या पलिकडं  बावडी होती.  तिथं बावडीजवळ मांड  पुजला होता. नारळ, केळी,  पानाचा विडा, हळदी- कुंकू  असं मांडलं होतं. जवळच समई जळत होती. अगरबत्ती, धुपचा सुगंध दरवळत होता. आम्ही प-याच्या अलिकडेच थांबून हे पाहत होतो. माझ्यासोबत आठ दहा माणस  होती. पलीकडं बरीचशी माणसं मांडाच्या भोवती बसली होती. मांडावर  बुवा आपलं मंत्र तंत्र म्हणत होता. म्हादानं  आपलं हिरवं  मफलर मानेभोवती नेहमीप्रमाणे गुंडाळलेलं , डोक्यावर गांधी टोपी. लांब बाह्याच्ं  शर्ट. दोन्ही हातोप्याची  बटणं  नेहमी खुलीच. असा पेहराव करुन आपल्या आवाजात गाणी गात  होता. धरकरी  मंडळी मागून साथ देत होती. ढोलकी व टाळ यांचा आवाज घुमत होता. एक दोन बायकांच्या अंगात झाड भरलं  होतं. प्रत्येक जण  आपली गा-हाणी  देवीपुढे  मांडत होता. कोण आपल्या घरातल्या माणसाचं आजारपण सांगत होता तर कोण  आपल्या गुरांची रोगराई मांड़त होता.यावर उपाय म्हणून काय, किती उपवास, पुजा अर्चा  करायची याचा  उलगडा देवीकडून  होत  होता. मध्येच म्हादा आणि  त्याची भजनकरी मंडळी ढोलकी व टाळ यांच्या तालात  पुन्हा गाणी गात  होती. ढोलकीचा  ठेका जसा चढंल तसा बायांच्या अंगात देवी नाचायला जोर यायचा. असं सर्व मनोरंजन  चालू होतं. शेवटी बुवा सगळं पिशवीत भरुन विडा घेऊन जायचा. बाराच्या आत सगळा कार्यक्रमआटोपायचा . मी  थोडा वेळ कार्यक्रम पाहिला व  दुस-या  दिवशी सकाळची शाळा . लवकर उठून कामावर जायचं  होतं म्हणून घरची वाट  पकडली.


    घरी आलो पण  झोप लागत नव्हती.   खरं तर  अंगात येणं  मी माझ्या बालपणीच पाहिलं  होतं . आमच्या भागात पूर्वी पासून देवदासी प्रथा चालत होती. कायद्याने त्यावर पूढे बंदीही आली. प्रत्येकाच्या घरी यल्लमा देवीची  पुजा केली जायची. रेणुका मातेचे गावात  एक मंदिर . दरवर्षी गावातून भाविक कर्नाटकात सौंदत्तिला जातात. दर पोर्णिमा किंवा मंगळवार  शुक्रवारी देवीची पुजा केली जायची. कांही बायकांच्या अंगात या वारी भरायचं. कौल लावला जायचा. देवीचा अंगारा लावून  प्रत्येकाला पाळणूकीचा सल्ला दिला जायचा. हे सर्व बालपणीच पाहीलं  होतं. श्रद्धा असावी पण  ती अंध नसावी हे शिकत आलो. मीही आई  बरोबर दोनतीन वेळा  सौंदतीला गेलो होतो. तिथं असणारं  सारं चित्र माझ्या समोर आज ऊभं राहिलं होतं.


    त्या रात्री   मी माझी मनाची व्यथा  'मांडावरचं झाड'  कवितेतून कागदावर  मांडली.


ढोलकीवरती थाप पडते,हातातले टाळ वाजू लागतात

मांडावरच्या बायांमध्ये देवी आता नाचू लागतात


लोक म्हणतात, झाड भरलं, झाड भरलं

देवी आता भविष्य नक्कीच सांगेल सगलं 


कोणी तरी मांडासमोर येतो, नारळ नी पैसा ठेवतो

पाया पडून  त्या झाडाला, उद्याचं  भविष्य मागतो


वर्षामागून वर्ष सरतात,विज्ञान युगात माणसं चालतात तरीही ही माणसं, या झाडावरचं  विश्वास  का ठेवतात?


समूळ उपटा ही झाडे, विज्ञानावर ठेवा विश्वास 

तरच नव्या दमाने घेऊ आपण ,नव्या युगातील श्वास


      

         आज  आधुनिक युगात या गोष्टीवरचा  विश्वास कमी झाला  आहे.  अंगात येणे हा एक मानसिक आजार आहे हे पटायला लागलं  आहे.  बहुतेकदा अंगात येण्याच्या घटना अशिक्षित, समाजविरहित राहणाऱ्या स्त्रिया किंवा पुरुष यांच्याबाबतीत घडतात. या व्यक्ती सतत एकच विचार करीत असतात. यामुळे भावनिक व अंधश्रद्धाळू विचार त्यांच्या मनात येतात.  व्यक्ती भ्रमिष्ट होते याला मनोरुग्ण अवस्था म्हणतात. याला न्यूरॉसिस संबोधले जाते. अनेकदा अंगात आलेल्या व्यक्तींची ओटी भरली किंवा प्रसाद देत कपाळी कुंकू लावल्यास ते नॉर्मल होतात. हा सर्व प्रकार त्यांच्या मानसिक भ्रमामुळे घडतो. हे विज्ञानाने सिद्ध केले आहे.अशा व्यक्तींवर संमोहन, मेडिटेशन द्वारे  मानसोपचारतज्ज्ञ  उपचार करत  आहेत. असं झाड आता क्वचीतच पहायला मिळते हेच समाजप्रबोधनाचे यश आहे.आता ही झाडे नष्ट होतील व नवविचारांची, पर्यावरण रक्षण  करणारी झाडे दिसतील हिच अपेक्षा! 





(फोटो: गूगल स्त्रोत )

Monday, August 17, 2020

गुरु आपल्या दारी

 # गुरु आपल्या दारी ..

    

       


     स्वामी विवेकानंद म्हणायचे, "जेंव्हा मुले शाळेत येऊ  शकत नाहीत तेंव्हा शाळेने मुलांकडे गेले पाहिजे." हा विचार आम्ही सद्यपरिस्थितीत प्रत्यक्ष कृतीत आणला आहे . कोरोनामुळे    मुलांना वाटत असलेले  एकाकीपण व त्यांचे बंद पडलेले शिक्षणाचे  मार्ग खुले करण्याच्या उद्देशाने मी व माझे दोन सहकारी शिक्षकांनी शिक्षणाची गंगा थेट विद्यार्थ्याच्या दारी नेण्याचं  ठरवलं. 


   जिथं नेटवर्क नाही  अशा वाडी- वस्तीवरील मुलांच ऑनलाईन शिक्षण बंद . तिथे मुलांच शिक्षण ऑफ़ राहून कसे चालेल?म्हणून आम्ही सुरु केला आहे उपक्रम 'गुरु आपल्या दारी' ...थेट विद्यार्थ्याना घरीच जाऊन मार्गदर्शन.अवांतर वाचन पुस्तकेही घरपोच . यात  महाविद्यालयीन विद्यार्थिनीही आपल्या भावंडांना शिकण्यास मदत करत आहेत.


शिकणं ही माणसाची  नैसर्गिक प्रेरणा आहे. ती जपली आणि तिचा वापर करण्यासाठी लागणारं वातावरण निर्माण केलं तर प्रत्येक मुलं स्वत:हून शिकतं .  हे आम्हाला या उपक्रमातून  समजलं. आज मुलाना मुक्तपणे खेळू देत, त्यांच्या आवडीनिवडी जोपासू देत, मनोरंजनासाठी जी  दुरदर्शनसंचासारखी   साधनं वापरली जातात  ती मुक्तपणे हाताळू देत .... पत्ते,सापशिडी, कैरम, बुद्धिबळ  असे बैठे खेळ घरीच खेळत ....कधी आईला स्वयंपाकघरात मदत करायची तर कधी बाबांबरोबर  नदीवर बैल धुवायला जात,  पाण्यात मजा करण्याचा अनुभव घेत.  असं सर्वकाही चालू ठेवत .. कोणतेही बंधन न पाळता, नवीन गोष्टी शिकण्यासाठी मुलांना  त्यांना हवं ते शिकण्यासाठी मदत करणारे गुरूच आपल्या दारी  येऊन  ज्ञान देऊ लागल्याने, मुलांना शिक्षण  आपलसं वाटू लागलं.


      मुलांचे एकटेपण तर  आता केंव्हाच निघून गेले आहे. सोबत   दुरदर्शन वरील सह्याद्री वाहिनीचे  'गली  गली सिम सिम', 'टिली मिली'  या कार्यकर्मामुळे  मुलांचे आनंददायी शिक्षणही सुरुच !   प्रत्येक भेटीत त्यांच्या चेह-यावर दिसणारा आनंद न्याराच! जेंव्हा शिक्षण आनंददायी वाटेल तेंव्हा जगणंच आनंददायी होईल याचीच ही प्रचिती!


  पूर्वी गुरुकुल परंपरा होती. खेडेगावात  विद्यार्थी आणि  शिक्षक एकत्र असायचे.गुरूच्या सहवासाने मुले घडायची. शिक्षक  त्या गावाचे  शहाणपण होते.अगदी 'पिंजरा' चित्रपटातील पूर्वार्धातील मास्तरांसारखे!आज या संकट काळात वाडीवस्तीवरील मुलांच्या शिक्षणासाठी गरज आहे शिक्षणव्यवस्थेतील प्रत्येकाने मनातून  गुरूजी होण्याची! प्रत्येक गुरुच्या समर्पणाची!


       ज्ञानाच्या  या महासागरात  प्रत्येक विद्यार्थ्याची जीवन नौका  गुरुशिवाय  मार्गक्रमण करुच शकत नाही. म्हणूनच गुरूचं स्थान अनन्य साधारण आहे.म्हणूनच आजच्या या संकटकालीन परीस्थितीत विद्यार्थ्याला  जगण्याचं बळ देऊया. शिक्षणाची गंगा त्याच्या दारी पोहचवूया.


 

श्री.श्रीकांत  कृष्णा पाटील


skplanj@gmail.com 

आनंददायी शिक्षण

 आनंददायी शिक्षण


         आज शनिवार .  घड्याळात सकाळचे आठ वाजले होते.  माझ्या शाळेने लॉकडाऊन काळात या शैक्षणिक वर्षात ' #गुरु आपल्या दारी' उपक्रम सुरु केला आहे. मी आज आठवडा भेटीत  #टिलीमिली कार्यक्रमाचा लाभ किती विद्यार्थी घेत आहेत हे पाहण्यासाठी  विद्यार्थ्यांकडे जायचे ठरवले. हेआनंददायी शिक्षण  खरोखरच  मुलापर्यंत पोहचते का? त्याना काय अडचणी तर नाही  ना?हे जाणून  घ्यायचे ठरवले.


        गेल्या आठवड्यात भेट दिली होती तेंव्हा वेगळे चित्र होते.    प्रत्येक विद्यार्थी स्वतःची एक जिवंत कहाणी घेऊन जगत असतो. याचा अनुभव  त्यावेळी आला. कोण विद्यार्थी आपली घरकामं उरकत होता.कोणाच्या घरी आजी आजारी होती तर कोणाला वडीलांच्या व्यसनामुळे   मुलाना शैक्षणिक वातावरण मिळत नव्हते. 

 कोणाजवळ घरी टी व्हीची सोय नव्हती तर कोणाचा डिशचा रिचार्ज  संपला होता.  या सर्व  गोष्टी विद्यार्थी मला बिनधास्त सांगत होते. या सर्व परिस्थीतीतही मुलाना समजून घेऊन , मानसिक आधार देऊन अभ्यासाला प्रवृत्त करायचे म्हणजे एक आव्हानच!  त्यासाठी  मी व   माझ्या सहका-यानी पालकांशी संवाद साधला. आपल्याकडे ऑनलाईन शिक्षण नेटवर्क नसल्याने मिळत नाही तरी दुरदर्शनचा लाभ घ्या अशी विनवणी केली. जुलैच्या वीस  तारखेपासून  कार्यक्रम सुरु होत आहे.याची माहिती दिली. समस्याबाबत   पालकांशी संवाद साधला.


 "आपण इतर वेळी मनोरंजनसाठी डिश  रिचार्ज करतोच ना! आज लॉकडाऊन मध्ये मुलांचं शिक्षण सुरु ठेवण्यास  रिचार्ज करुया."


 "कोणा शेजारील विद्यार्थ्याकडे टी  व्ही नसेल तर त्याला अर्धा तास कार्यक्रम पहायला देऊया."


"शासन आपल्यास घरी बसून मोफत शिक्षण देत आहे .त्याचा लाभ घेऊया"


     प्रत्येक पालक भेटीत  त्याना मार्गदर्शन केले. आज सामाजिक बांधिलकी जपत काही पालक शेजारच्या मुलांसाठी आपला टिव्ही सुरु करतात. 


  मला  दारात पाहताच सहावीत शिकणा-या हर्षंन च्या काकी  म्हणाल्या, "कालच्या कार्यक्रमात व्याकरण शिकवत होते. ते आमच्या बाबूने वहीत लिहलय .

 शेजारचा मकरंदही आमच्या इथंच  कार्यक्रम बघतो." 


 पाचवीतील  ईशाच्या  शेजारची आजी म्हणाली, "गुरूजी ,मी  काल सकाळी जेवण तयार करत करत कार्यक्रम पाहीला.दोन मुलाना घेऊन त्या बाई खूप समजाऊन शिकवित होत्या." असे  ऐकून टीली मिली अगदी काकी आजीपर्यंत घराघरात पोहचल्याची प्रचिती आली. 


    आज विद्यार्थी  हा कार्यक्रम पाहून आनंदीत आहेत.  शाळा बंद असली तरी शिक्षण चालू झाल्याने या टिली मिली ने आमची चिल्ली पिल्ली  नक्कीच सुखावलेत.  त्या कार्यक्रमाची आवड, त्यातून मिळणारा आनंद  भेटीत  मला मुलांच्या चेह-यावर  दिसून आला.  कार्यक्रम पाहून आपसुकच मुले गुणगुणू लागली आहेत .


 " आकाशातील जमले तारे ...टिली मिली टीली मिली

  अभ्यासाला जमले सारे.....टिली मिली टीली मिली"


  खरचं, शिक्षण  आनंददायी वाटलं  तरच जगणं नक्कीच आनंददायी वाटेल  यात यत्किंचितही शंका नाही बरं का!


- श्रीकांत पाटील

skplanj@gmail.com

रेंजच्या शोधात

 रेंजच्या शोधात 

           

      संध्याकाळी   मी नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला निघालो . ग्रामपंचायत जवळ पोहचलो. तिथे  कट्ट्यावर मुलांची  गर्दी दिसली.  गावच्या एखाद्या सभेलाही एवढी  लोकांची उपस्थिती नसते तितकी मुलांची गर्दी !


 मी गर्दी पाहून म्हणालो, "अरे , सभा भरली की काय तुमची? 


"गुरूजी रेंजच्या शोधात आलो.  खुप कंटाळा येतो हो घरी बसून" मुले हसत हसत म्हणाली.


कांही मुले भिंतीला टेकून  हातात मोबाईल घेऊन बोलत बसली होती.कोणी कॉल करत होते. कोणी मान खुपसून मोबाईलमधील व्हिडिओ पाहत  होते. कांही गेम खेळत  होती. कांही गुराखीही त्यांच्यासोबत बोलत होती. कांही  गुराखीही आपला साधा मोबाईल घेऊन संवाद साधत होती.


        लॉकडाऊनमुळे  बहुतेकसे लोक गावी आले आहेत.त्यामुळे गावातील बहुतेकशी बंद घरेही सध्या  उघडली  आहेत.घराला घरपण आले.माणसानाही फारच सुखावह वाटू लागले. त्यात पावसाळ्यात गावचे वातावरण  तर खुपच  सुंदर! पण   ज्या मुलाना  मोबाईलचे व्यसन जडले आहे. त्याना त्याच्याशिवाय गावाकडे करमतच नाही. त्यामुळे ही मुले रेंजच्या शोधात फिरत असताना दिसतात. शहरात घरातून बाहेरही न पडणारी ही मुले रेंजच्या शोधात ऊंच ठिकाणे शोधू लागली.  तरुणांचा कधी टेकडीवर तर कधी ऊंच इमारतीवर  तर मुक्कामच! . कानात इयरफोनच्या गुंड्या घातलेल्या  व डोळे स्क्रीन वर खिळलेले. कॉलेज बंद. कंपन्या बंद.मग करणार काय?हा प्रश्न समोर  त्यांच्यासमोर उभा. कांहीचे कामकाज तर  घरातूनच.त्यामुळे तेही रेंजच्या शोधातच!  त्यानी आपला लैपटॉप घेऊन चक्क निवांत रानातील ऊंच जागा  शोधलेली!


   गावात  पूर्वी बीएसएनएलचे नेटवर्कच होते. त्यामुळे आता बहुतेकजणांकडं याचं कंपनीची सुविधा असणारे ,पण  ती सध्या बंदच.  सध्या जिओ चे नेटवर्क.त्यामुळे सगळे अगदी "जिओ जिवस्य जीवनम "म्हणत   एकमेकाला डाटा देतात.  ऊंच टेकडीवर , कट्ट्यावर बसून' एकमेका सहाय्य करु 'असे म्हणत  हॉट स्पॉट  ने प्रत्येकजण जोडलेला.मोबाईलची रेंज मिळावी यासाठी झाडावर, उंच भिंतीवर, गावाच्या शिवारावर, उंच टेकडीवर लोक फिरत असल्याचे दृश्य जेवढे मजेशीर, तेवढेच संतापजनक आहे. तंत्रज्ञान प्रगत होत असले तरी  गावांमध्ये माकड उड्यांचा हा प्रयोग चालूच असतो.


      रेंजच्या शोधात बरीच मुले येतात. फावल्या वेळात मोबाईलवरचे खेळ सुरु करतात. अगदी लुडो,काररेस , बबल शुटर, टेम्पल्ड रन, कंडी क्रश  ते पब्जी पर्यंत. एकीकडे कोरोना विरुध्द युद्ध करताना दिसणारे योद्धे असताना दुसरीकडे   निवांत वेळ घालवणारे हे पब्जी योद्धे पाहताना कीव येते.  अशा वेळेचा सदुपयोग त्यानी करायला हवाच!. गावातील शेती कसायला मदत करावी. फावल्या वेळेत आपले छंद  जोपसावेत जे आपल्या प्रगतीस हातभार लावतील.  


  सध्या  गावात  आम्ही वाचनकट्ट्या मार्फत घरपोच पुस्तकेही द्यायला सुरुवात केली आहे.  पुस्तकासारखे मित्रच नाहीत. आपला एकटेपणा ती नक्कीच घालवतात. आभासी जगात  वावरण्यापेक्षा वास्तव जीवन कधी जगायला शिकणार?    मोकळ्या हवेत फिरायला हवं, व्यायाम करायला हवा, गावच्या स्वच्छ हवेतील प्राणवायू  प्रत्येकास जगण्यास नवीन प्राण देईल. 


     मुळात सध्या सोशल मीडियावर जे काही सुरू आहे ते वास्तव नाही, याचे भान बाळगणे गरजेचे आहे.  वास्तव आयुष्य खूप वेगळे आणि चांगले आहे. केवळ आभासी लाइक्स आणि फेव्हरिट म्हणजे आयुष्य असा गैरसमज करून घेतला तर पुढे प्रत्यक्ष आयुष्यात नैराश्याला सामोरे जावे लागेल. ते टाळण्यासाठी वेळीच समजून घेऊया, हा आभास आहे, वास्तव नाही!


      सोशल मीडिया म्हणजे खरे तर आभासी जग. पण त्यालाच वास्तव समजण्याचा झालेला घोटाळा आता अनेकांना मानसिक विकारांच्या दिशेने खेचून नेतो आहे. ‘‘उसके लाइक्स मेरे लाइक्ससे ज्यादा कैसे?’’ या प्रश्नाने केवळ तरुणाईचीच नव्हे तर त्याहीपेक्षा मोठय़ा असलेल्या पिढीची झोप उडवलेली दिसते. खरे तर फेसबुक किंवा इतर कोणत्याही सोशल नेटवर्किंग साइटस्वर मिळणारे लाइक्स असतील किंवा फेव्हरिट्स; त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यात कोणताही फारसा फरक पडणार नसला तरीही मानसिक अस्वास्थ्याच्या दिशेने प्रवास सुरू झालेल्यांची आणि निद्रानाशाला सामोरे जावे लागलेल्यांचीही वाढलेली संख्या या इशाऱ्यांच्या घंटा वेळीच समजून घ्यायला हव्यात.  या आभासी आनंदात  आपण रेंजच्या शोधात बाहेर पड़लोच  तर   आपले  जीवन 'आउट ऑफ़ कवरेज'  कधी होईल हे समजणार नाही.म्हणून वेळीच जागे होऊया.


-श्रीकांत  पाटील 

म्हादां

 म्हादां 


      त्यादिवशी सकाळी सकाळी  सहा वाजता  अंगणातील गेटचा आवाज झाला.  मी बाहेर  फिरायला जाण्याच्या तयारीत होतो.  हळूच मी बाहेर खिडकीतून  डोकावून पाहिले. म्हादां  दारात हजर!


मी आश्चर्याने म्हणालो, "ओ कदमांनु , लवकर. आज काय काम  काढलं?"


"काय नाय तुमच्याकडचं काम  व्हतं. जरा माझ्या पेन्शिनीचं काय तरी बघा."  म्हादा लगबगीने म्हणाला. 


मी म्हटलं , " दोन फोटो  तेवढं काढून ठेवा. तुमच्या त्या काल  भेटलेल्या माणसाकडं  देऊया"


          म्हादां... मी राहत असलेल्या  शाळेच्या गावातील म्हणजे केळवलीतील(ता.लांजा, जि.रत्नागिरी) एक सत्तरीतला माणूस.   महादेव कदम असं त्यांचं नाव. पण...  बहुतांशी लोकांची त्याना " म्हादां ऽऽऽ "   अशीच हाक .  माझी मात्र त्याना आडनावावरुन म्हणजेच  "कदमांनु ऽऽऽऽ " अशीच हाक .   कुठल्याही कार्यक्रमाला, सभेला, बैठकीला बाहेर  पडताना म्हादांच्या गळ्यात एक हिरवं-तपकिरी मफलर नेहमी गुंडाळलेल्ं, हातात एखादी तंबाखू पानाची पिशवी अडकवलेली .... डोक्यावर  पांढरी गांधी टोपी... अंगात स्वेटर व त्यावर एक शर्ट घालून बटण न अडकवता  शर्टचे दोन्ही  हातोपे  मोकळे सोडलेले... फुल्ल पँट असाच पेहराव.   तोंड नेहमी पान सुपारीनं  रंगलेले.


   म्हादांची आणि  माझी ओळख मी शाळेत हजर झालेल्या दिवसापासूनच.  त्यावेळी  ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहत  होते. कदाचित राजकारण हा त्यांचा आवडीचा  भाग नसावा. पण वॉर्डमधून ऊभं केलेलं त्यामुळं  निवडून आला असावा.  पण  त्यांच्या वाडीत ज्येष्ट माणसापैकी एक.  शाळेच्या व्हरांड्यात बैठकीला नेहमीच हजर. बैठक गावच्या कामाची असो अथवा शाळेच्या कामाची. तो नेहमी पुढं .


          म्हादांला  नमन, शाहिरी, जाखडी,  यांची विशेष आवड.  बायांची गाणी  गाण्यात  तर एक नंबरच!पूर्वीपासून त्यांचं वाडीत  कोकणी कला सादर  करण्याचं, जपण्याचं काम   चालूच. माझ्या शाळेत दरवर्षी झेंडावंदनच्या दिवशी म्हादांचं   भाषण हमखास!सभेच्यावेळी  छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, एखादं पारंपारिक नमन मधील गीत  व्हायचं. बहुतेक रचना त्यांच्या मुखोद्गत.  शाळेत काय कार्यक्रम असेल तर म्हादां  पहिला हजरच! श्री सत्यनारायण पुजेच्या   कार्यक्रमात  तर सर्व पुजेची, प्रसादाची तोच व्यवस्था करी. कोणतंही  सार्वजनिक काम  आवडीने करायचं हे म्हादांकडूनच शिकावं . आजही गुरं राखणं  , भातशेतीकाम म्हादांचं  संसारकाम चालूच असतं.  पावसाळ्यात  घरा शेजारी पर्याला अऊर आलाच  'इन ' घेऊन म्हादां  चढणीचे मासे पकडायला हजर..!

 खेकडी  पकडायला  ओढ्यात  बांध  घालून 'गरावणं ' टाकलेलं .  'खोइन ' लावलेली. म्हादांला या सगळ्याची आवड.


    वाडीतील सार्वजनिक कामात  म्हादांशिवाय पान हलत नाही. ज्येष्ट माणसं श्रेष्ठ असतात. ती अनुभवानं समृध्द  असतात.  त्यांचा अनुभव नेहमीच पुढच्या पिढीला उपयोगी पडत असतो. त्यांचा आपण तरूण  पिढीनं आदर करायला हवा. बदलत्या काळाबरोबरच्या गोष्टी जुन्या लोकाना समजावून सांगून नवे  बदल स्विकारायला हवेत.तेही  अशा मोठया माणसांना न दुखावता !


    यंदा शिमगोत्सवात  मला त्यांच्या कलेची विशेष  झलक पहायला मिळाली. प्रत्येकाच्या अंगणात पालखी गेल्यावर गाण  व्हायचं. म्हादाच्या हातात  डफ, सोबत पाच - सहा धरकरी त्यापैकी एकाच्या  हातात  चौंडक,  दुस-याच्या  गळ्यात ढ़ोलकी व इतरांच्या हातात टाळ  असायचे.  डफ़ावर थाप टाकताच म्हादांला जोश यायचा.मग गाणं  म्हादांच्या अंगात संचारायचं अगदी अंगात भरल्यासारख! ही गायनाची नशा काय औरच! या सत्तरीच्या  वयातही तो उत्साह तरुणांना लाजवणाराच  होता. 


    खरंच, माणसाला एखादा छंद, सर्व कांही दुःख विसरायला लावतो.  त्यातून  स्वतः आनंद घेण्याबरोबर दुस-यालाही देता येतो. म्हादांचंही तसंचं होतं.  शिमगोत्सवात म्हादांला एक माणूस  भेटायला आला. त्याच्याजवळ आपल्या कलेबाबत सांगितलं. त्या माणसाने आपण   शासनाकडून मिळणा-या शाहिरी  मानधनबाबत प्रस्ताव करण्यासाठी प्रयत्न करुया असं सांगितलं. म्हादांकडं  ही शाहिरी  कला अंगभूत आहे.  वाडीतील मधुकर पंदेरे सारखी  कलाकार माणसं  शाहिरी क्षेत्रात घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा  आहे. आज मधुबुवांना कला क्षेत्रातील महाराष्ट्र भुषण कलागौरव पुरस्कार मिळाला आहे.  हीच कलेची परंपरा  तुषार  मधुकर पंदेरे ही चालवत आहे. तुषारबुवांची विविध जाखडीची गाणी  तर सर्वाना मंत्रमुग्ध करतात.त्यांची कांही  जाखडीची डबलबारीही चित्रीत केली आहेत. 


    म्हादां  आपल्या कलेच्या सुरुवातीचा काळ  सांगताना म्हणतो,    "आम्ही त्याकाळी नमन , जाखडीचे कार्यक्रम  कंदिलाच्या प्रकाशात करायचो.  चालत जायचं , गणपतीत, शिमग्यात  कार्यक्रमाच्या सुपारी  मिळत. त्यावेळी जास्त पैसं मिळत नसंत.पण..  आम्ही लोक आवडीने कार्यक्रम करायचो." 


   आज म्हादांच्या या कलेबाबत त्या काळातील    कार्यक्रमाचं काहीही  लिखित व चित्रफित उपलब्ध नाही. अजूनही  ती कला , त्यावेळची गाणी त्याना मुखोद्गत आहेत. शासनाने अशा कलाकारांसाठी मानधन योजना सुरु केली आहे. पण  म्हादांकडं  पुरेसं रेकॉर्ड नसल्यानं अजूनही मानधनाविना तो वंचितच आहे. म्हादांला भविष्यात ते मिळेल हिच अपेक्षा!


-श्रीकांत पाटील 


शिकवणी

 शिकवणी


   नुकताच माझा  बारावीचा निकाल लागला होता.  तालुक्यात कला शाखेत  मी प्रथम आल्याचं  समजलं.  त्यामुळे मी खूश होतो. पण  कॉलेज मात्र दु:खी होतं . बोर्डात अवघ्या दोन गुणांनी मी यादीतून हुकल्यांमुळं . ज्या ध्येयाने मी कला शाखा निवडली होती ते  ध्येय पूर्ण होणार होते. शिक्षक होण्यासाठीचा मार्ग सुकर झाला. प्राथमिक शाळेतील 'माग  भीक पण  मास्तरकी शिक .' हा  सुविचार प्रत्यक्ष जगायची वेळ  आता आली  होती.   डीएड़ कोर्सला माझा गारगोटी,जि.कोल्हापूर   येथे मौनी विद्यापीठात प्रवेश निश्चित झाला. अवघ्या नव्वद रुपयात प्रवेश पूर्ण झाला. पण  त्यावेळी वसतीगृहाच्या  वर्षभराच्या प्रवेशासह हजार रुपयापर्यंतचा खर्चही भरण्यासाठी नातेवाईकांच्याकडून आईने  पैसे मागून घेतलेले.  


      कॉलेज सुरु झालं. प्रत्येक प्राध्यापक आमची वर्गात ओळख करुन घ्यायचे. त्यात  प्रा. यादव सर  प्रत्येक तुकडीतील विद्यार्थ्याच्या कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीची माहिती विचारायचे. मी माझी परिस्थिती सांगितली. त्यानी मला गणित विषयाचे प्रा.शिंदे सराना भेटायला सांगितले. पहिल्यांदा लाजवट  स्वभावामुळं  एखाद्या मोठया व्यक्ती समोर जायला भिती वाटायची.  पण  आता लाजुन कसं  भागणार? आता शिकायचं, शिकवायचं म्हटलं तर धाडस करावं  लागणारच! 

 प्राध्यापकांच्या पुढं  जाताना घाबरणारी  आम्ही मित्र मंडळी  एकमेकांना साथीला घेऊन जात होतो.   शिंदे सराना  ऑफीसात भेटलो. सरानी  संध्याकाळी घरी येण्यास सांगितले. मी व माझ्या खोलीत राहणारा मित्र सरांच्या घरी गेलो. ते गारगोटीतच भक्ते कॉलनीत  राहत होते. 

त्यानी मला विचारलं,

 " हे बघ.  तू   शिकवणी सुरु कर. इथच कॉलनीत  बापटांच्या घरी त्यांच्या मुलाना शिकव.  तुला मिळणा-या फी मधून तुझा खर्च भागायला मदत होईल."


     मी लगेच होकार दिला.


     तशी इथल्या डीएड़ कॉलेजला येणा-या व वसतीगृहात राहणा-या बहुतेक  विद्यार्थ्याची घरगुती शिकवणी  घेण्याची परंपराच! ग्रामीण भागातीलच विद्यार्थी इथे येत.त्यामुळे बहुतांशी शेतकरी कुटुंबातीलच ही मुलं  शिक्षक होण्याच स्वप्न उराशी बाळगून  ती शिकवणी घेऊन पूर्ण करत. एका तुकडीचे विद्यार्थी  आपल्या शिकवण्या येणा-या तुकडीतील  विद्यार्थ्याना जोडून देत.  कॉलेजच्या अभ्यासाबरोबर प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव मिळत असे. त्यामुळे हे वस्तीगृहात राहणारे,  शिकवणी घेणारे , स्वावलंबी जगणारी मुले  कॉलेजात नेहमी टॉप राहत.


 त्यानी मला  कॉलनीतील त्या  बापटांच्या घरी घेऊन गेले.  माझी व  बापट काकींची ,त्यांचा मुलगा मंदारची  ओळख करुन दिली.  


ते बापट  काकीना  म्हणाले, "हा विद्यार्थी कॉलेजमधला प्रवेश घेतलेला   टॉपर  विद्यार्थी आहे. तुमच्या मंदारला चांगले शिकवेल.' 


काकीनीही आपल्या मुलांसोबत शेजारच्या 

 मंदारच्या  वर्गातील दोन मित्रानाही  क्लासला येण्यास सांगितले. 

दुस-या  दिवशी बापटांचा मंदार, कोतमिरेंचा सुरज, पाटलांचा संग्राम (आम्ही सर्व त्याला 'बबलू' म्हणूनच ओळखत)  या तिघांना घेऊन शिकवणीचा श्रीगणेशा  झाला.  मुलानीच क्लासचे नाव  'यशोदीप' ठेवले. मंदारच्या घरच्या माडीवर एका खोलीत वर्ग भरला.  यापूर्वी इथेच दुसरे वर्ग  चालायचे. ज्ञानदीप क्लास. त्यामुळे मंदारने  'यशोदीप 'नाव  सुचवले.  हे तिघेही विद्यार्थी पाचवीला होते. विद्यार्थी हा शिक्षकांसाठी देवच असतो . ते माझ्या समोर त्रिमूर्तीच होते, अगदी दत्तासारखे!


    मंदार एक हुशार विद्यार्थी. नेहमी टापटीप रहायचा.जसा  शिस्तीने रहायचा तसाच अभ्यासातही ! मांडीवर आधाराला पँड  घेऊन  नेहमी सुबक लेखन करायचा. कविता गायन उत्तमच. पाठांतर  अगदी एकपाठी.  बहुतेकदा त्याचा  अभ्यास पूर्ण असायचा.  हिच त्याची अभ्यासू वृती  त्याला आज अभियंता बनण्यास मोलाची ठरली.


   दुसरा  विद्यार्थी सुरज  कोतमिरे. खेळत बसला की अभ्यास विसरायचा.  कधी कधी क्लासला मी वर्गात पोहचल्यावर  माडीच्या पायरीवर धापऽऽ ...  धापऽऽ पाय  टाकत  धावत पोहचायचा. हातात  पुस्तके घेऊन ऊशीर झाल्याच्या अपराधी भावनेने डूलत शिकवणी वर्गात प्रवेश मागायचा.  अभ्यास तपासताना डोके खाजवत  घरचा अभ्यास विसरल्याची कबुली द्यायचा.


        पाटलांचा बबल्या म्हणजेच संग्राम म्हणजे गुबगुबीत गालाचा विद्यार्थी. मी  त्याचे  इंग्रजी शब्द पाठांतर घेत असे.  शब्द पाठ नसतील तर मला सुर काढत  म्हणायचा, "सर, शब्द पाठ झाले नाहीत हो...."  सुरज व बबलूचे अक्षर थोडे वळणदार  नव्हते.   पुढे ते सरावाने सुधारलेही.आजही संग्रामची  भेट झाली तर तो इंग्रजी शब्द पाठ करण्याची शिकवलेली पध्दत  आठवणीने सांगतो. "Geo...gra....phy..जिऑग्राफी म्हणजे भूगोल. " ही पध्दत  अभियंता होताना उपयुक्त ठरल्याचे आजही प्रत्येक भेटीत सांगतो.  


         शिकवणी सुरु करुन महिना संपला. दिवाळी सणाची हिवाळी सुट्टी सुरु झाली. मला गावी जाण्यापूर्वी   शिकवणीचे नव्वद रु.मिळाले. ही माझ्या आयुष्यातील शिक्षक म्हणून पहिली कमाई !  पहिला गुरूदक्षिणाच म्हणा ना!  सुट्टीनंतर माझे कॉलेज सुरु झाले.  वसतिगृहातील माझ्या सिनीयर्स  मित्राना मी मिळालेल्या फी बाबत म्हणालो. त्यावेळी एखाद्या कुटुंबातील दोन भावंडांची   शिकवणी घेण्यासाठी दोनशे रुपये मिळायचे. मित्रानी मला दुसरी शिकवणी बघू म्हणून सांगितले.  


     इकडे यशोदीप शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांचा सहामाहीचा निकाल लागला होता. तिघेही प्रगतीपथावर होते. मंदार वर्गात टॉपर होता. सुरज , बबलूचेही परीक्षेत गुण  वाढले होते.    

     मी तिकडे शिकवणीला न गेल्याने एक दिवस मला प्रा.शिंदे सरानी स्टाफरुममध्ये बोलावले व म्हणाले, "श्रीकांत ,तू बापटांचा  इथं क्लासला शिकवायला गेला का नाहीस? "  

      मी त्याना माझ्या सिनीयर्सच्या सांगण्यानुसार , माझ्या पहिल्या कमाईची माहिती सांगितली व नवीन शिकवणीच्या शोधात आहे, असे म्हणालो. त्याना बापट काकींनी मुलांच्या प्रगतीबाबत माहिती दिली होती. काकींनी  मला बोलावले . मी घरी गेलो. पालक खूश होते. मी न सांगताच त्यानी फी दुप्पट देण्याचे सांगितले. मुलांच्या यशाला त्यानी प्राधान्य दिले व माझ्या शिकण्यास हातभारही.त्यानी कोणतेही भाडे न घेता मला त्या माडीवरच्या खोलीत अधिक वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली.


   हळुहळू  अधिकचे वर्ग सुरु केले. सकाळी कॉलनीतील शिकवणीचे  वर्ग.  संध्याकाळी घरी जाऊन शिकवणीचे दोन वर्ग. असे सुरु झाले. घरी जाऊन घेण्याच्या शिकवणीतला एक वर्ग गणेश लोहार या सिनीयर मित्राने जोडून दिला होता.  या  शिकवणीत हराळे  कुटुंबातील  सपना   व अक्षय   ही दोन  भावंडे  होती. त्यांचे वडील बांधकाम विभागातील अधिकारी.  दोन्हीही चुणचुणीत हुशार मुलं.  सपना  अगदी धाडसी तर अक्षय  लाजत बोलणारा .दोघेही अभ्यासात हुशार.सपना विविध स्पर्धा, उन्हाळी शिबिरे  मध्ये सहभागी व्हायची. एका उन्हाळी शिबिरातले तीने घोडेस्वारी, खेळ, पोहणे याचे  अनुभव सुट्टीनंतर आनंदाने सांगितले.   आज सपनाने वकिली व्यवसायात व अक्षय सी ए म्हणून  स्वत: चा व्यवसाय कोल्हापुरात सुरु केल्याचे  समजले. मुलाना योग्य वेळी पालक व शिक्षक यांचा आधार  भेटला तर ती अगदी झाडावरच्या वेलीगत  सरसर आयुष्याच्या वृक्षावर  चढतात.


   सपनाच्या घरा शेजारील रसिका  व लता  या मुलीही नंतर भक्तीकॉलनीत  यशोदीप क्लासला येऊ लागल्या. 

पुढे पुढे शिकवणी वर्ग वाढत गेले.  सिनीयर्स मित्र हरीश गुरवने  मला लाड कुटुंबातील श्रद्धा व अभिजीत चा घरगुती शिकवणी वर्ग जोडून दिला.  गारगोटीच्या सरोजिनी कॉलनीतील प्राचार्य मा. गो. माळी  सरांच्या नातवंडाना शिकवण्याचा योगही आला. घरगुती शिकवणीला  स्वप्निल व अजिंक्य ही दोन विद्यार्थ्यांचे खुपच गुरुप्रेम मिळाले.  त्यांच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्रातील  प्रवेशद्वारावरील 'येथे विद्यार्थी हा देव आहे.' हे वाक्य  जीवनात दिशा देऊन गेले.


    सकाळी तीनं शिकवण्या  व कॉलेज सुटल्यावर दोन  शिकवण्या असत. संपूर्ण दिवस कामाने खचाखच भरलेला! सकाळी साडे सहा ते साडे नऊ भक्ते कॉलनीतले वर्ग, अकरा ते पाच कॉलेज,  सायंकाळी  साडेपाच ते साडे सात-आठ  पर्यंत  घरगुती शिकवणी.

असे बिझी वेळापत्रक. या शिकवणीच्या ठिकाणीच आमचे बहुतेक सण  साजरे व्हायचे. सणाला भोजनाला नेहमी आमंत्रण  असायचे. ते केवळ फी मिळवण्याचे ठिकाण नव्हते ते आमचं कुटुंब होतं.  शिक्षक प्रशिक्षण घेत घेत हा प्रत्यक्ष शिकवणीचा  अनुभवच  कॉलेजात मला टॉपमध्ये येण्यास मदतीचा ठरला . तसेच जीवनाला चांगले वळण देणाराही.


   दोन हजार साली  डीएड़ पूर्ण झाले.  तरीही जवळच्या कर्मवीर हिरे  कॉलेजात प्रवेश घेऊन पुढचे पदवीचे शिक्षण सुरु केले.सोबत शिकवणीचे वर्ग सुरुच. एफ.वाय.बी ए चे एक वर्ष पूर्ण केले.  आता यशोदीपमधील मंदार, सुरज , संग्राम ही मुलं  आठवीच्या वर्गात पोहचली होती. सहामाही झाली. दिवाळीनंतर  मला डिसेंबर महिन्यात रत्नागिरी जि.प. नोकरीचा कॉल आला.  आता ही आमची कौटुंबिक शिकवणी बंद होणार होती.  हे  पाचही शिकवणीचे कुटुंब खुपच निराश होते.  


  नोकरीवर जाण्यापूर्वी मी विद्यार्थ्याच्या घरी  भेटायला गेलो.  हातात  पेढे होते. मनात खुशी होती नोकरी भेटल्याची..पण  दुसरीकडे या जीवनाला अनुभवाची शिदोरी देणारी शिकवणी चा  वियोग होता. विद्यार्थ्यंच्या चेह-यावर  निराशा दिसत होती.  त्या दिवशी भेटलेल्या पालकानी ऋण व्यक्त केले. माझे अभिनंदन केले.मला नोकरीसाठी शुभेच्छा दिल्या. अजूनही ते विद्यार्थी माझ्या'  'माझे गुरुकुल ' या वाट्स अप गृपच्या माध्यमातून संपर्कात असतात. अशा  शिष्यांशिवाय  माझे गुरुकुल पूर्ण होणे अशक्यच!

     

      शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे.पण सध्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात क्लासचा धंदा सुरू केला आहे . राजकारणी आणि संबंधितांनी या धंद्यात आपले पक्के पाय रोवले आहेत.  शाळा प्रवेशापासून प्रत्येक पायरीवर धन गोळा केलं  जात  आहे. शिकविणे कमी, पण राजकारण जास्त . यांना सरकारचे शिक्षण खातेही काहीही करीत नाही. त्यामुळे चालकांचे बळ अधिक वाढले आहे. म्हणून  आज गरज आहे ती  शिकवणीतून  गुरु- शिष्य नातं  घट्ट होण्याची. या पेशातील  धंद्याचे रुप जाण्याची! 


-श्रीकांत पाटील


आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...