शिक्षक दिन ..विशेष लेख.
।।तस्मै श्री गुरवे नमः।।
गुरुवारचा दिवस. सकाळी साडेदहाची वेळ. दररोजच्या नियोजनाप्रमाणे सर्व विद्यार्थी शालेय प्रार्थना एका सुरात गात होते.
"गुरू ईश्वर तात माय
गुरुविन जगी थोर काय"
हे प्रार्थनेतील शब्द गुरूची महीमा सांगत होते.
खरंच, " गुरूबिन ज्ञान नही" म्हणतात ते उगाचच नाही.
अगदी जन्मापासून जीवनाला दिशा देणारे गुरूच.
आयुष्यभरात अनेक गुरु लाभत असतात. जन्मतःच आई गुरु म्हणून लाभते. वडील ही पाठीशी खंबीरपणे उभे राहून जीवनदिशा दर्शवित राहतात. शैक्षणिक जीवनात निरंतर ज्ञान देणारे शिक्षकवृंद. 'गुरु' या शब्दातील ‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणे.’ गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे, ते आपल्याला शिकवतात.जन्मापासून आपण आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींपासून, माणसांपासून काही ना काही तरी शिकत असतो आणि म्हणूनच तर आपण जगण्यायोग्य बनत जातो. प्रत्येक गोष्ट जी आपल्याला शिकवण देते ती गुरुच असते. उदाहरणार्थ सूर्य, पृथ्वी, वारा, अग्नी, जल, नद्या, झाडे, फुले, पाने, ढग, डोंगर निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला काही तरी बोध देत असते. या सर्वांना आपण गुरुस्थानी मानून त्या प्रत्येक पदार्थाविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. त्यांची देण्याची, त्यागाची, परोपकारी वृत्ती आपल्यात आली पाहिजेआणि या गोष्टी शिकवण्यासाठी आपल्याला योग्य गुरूची आवश्यकता असते.
प्रत्येकाच्या विचार सरणी प्रमाणे प्रत्येकाचे गुरु विषयी मत सुद्धा वेगळेच.विखुरलेल्या जीवनात जर अचानक कुणी आपली मानसिकता समजून, योग्य दिशा दाखवणारा भेटला तर तो आपल्याला गुरु समान असतो. असे आपले अनेक गुरु असतात की त्यांना ही माहीत नसते त्यांना आपण गुरु मानतो.
आजच्या धावत्या जगात प्रत्येकाच्या जीवनात फक्त प्रश्नचिन्ह उमटलेली दिसतात.या प्रश्नचिन्हाच्या जाळयातून बाहेर काढणाराच खरा गुरू ठरतो. समजून घेणारे शिक्षक विद्यार्थ्यामध्ये लोकप्रिय असतात.त्या शिक्षकांना आदरही मिळू शकतो.मात्र हा आदर मिळवणं मोठं आवघड काम आहे.हा आदर मिळवण्यात यशस्वी होणाराच खरा गुरू होऊ शकतो. शिक्षक मार्गदर्शन करत असताना शिष्याला समजून घेण्याची पद्धत वा मार्ग वेगळा असू शकतो तो मार्ग गुरुने जाणला पाहिजे.
आजकाल पूर्वीची गुरूकुल पध्दतच खूप चांगली आणि आदर्श होती असे वाटते.मुलांना ऋषीमुनींकडे अरण्यात पाठवत. मग ते गुरू त्यांना स्वावलंबनापासून तर सर्व प्रकारच्या कलागुणांमधे पारंगत करीत असत. त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार करीत असत. स्वत:च्या आचरणाने त्यांच्यात चांगले गुण परोपकार, त्याग, शोर्य, इतरांशी वागण्याची पध्दत, मोठ्यांविषयी आदर, सर्वांसाठी प्रेमाची भावना इत्यादी रुजवत असत. पालक देखील त्या गुरूंच्या ताब्यात आश्रमात सोडून निघून जात आणि त्या शिष्याला शिक्षा करण्याची मुभा गुरूला असे.आता तर शिक्षक शिक्षाही करू शकत नाही. 'छडी लागे छम छम, विद्या येई घम घम 'हे गाण्यातील शब्द आता मागे पडलेत. आज मुलेही फारच संवेदनशील मनाची झाली आहेत. त्यांचं मन जपणं हे फारच कौशल्याचे आहे.
आपल्याला प्राचीन इतिहासात पाहायला मिळते,उत्कृष्ट धनुर्धारी एकलव्य गुरुविना दिशाहीन होता,गुरु नसला तरि त्याने मातीत गुरु शोधला.गुरु द्रोणाचार्यांचे अर्जुनाप्रती असलेले प्रेम हे गुरु च्या शिष्य प्रेमाचे मोठे उदाहरण आहे,एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून दिलेला अंगठा हे गुरुप्रती गुरुभक्तिचे उदाहरण पहावयास मिळते.गुरुमुळे जीवनाला स्थिरता येते.
मी सुद्धा एक शिक्षक आहे,ज्ञानदान हे शिक्षकाचे आद्य कर्तव्य असले तरी देशासाठी देशभक्त तयार करण्याचे कार्य खरे शिक्षक करीत असतात.आपल्याला एक चांगला नागरिक बनविण्यात जे जे शिक्षक वाटेत भेटत गेले त्या सर्वांप्रती आज शिक्षक दिना निमित्त कृतज्ञता प्रत्येकाने व्यक्त करायलाच हवी. त्याना माझे सदैव नमन !
गुरवे नमः। गुरवे नमः । गुरवे नमः॥
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
- श्रीकांत पाटील
skplanj@gmail.com
#thankyouteachers
No comments:
Post a Comment