Sunday, June 14, 2020

वर्दीतला देव


           


      गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात अतिवृष्टी व महापूराने थैमान घातले .याच महाप्रलयात  कर्तव्यनिष्ठा बजावत असताना दीड किलोमीटर पूराच्या पाण्यातूनही दोन मुलींना खांद्यावर घेऊन  खाकी वर्दीतील पोलीस कॉन्स्टेबलने त्याना जीवदान दिले आणि त्यांच्यासाठी ते देवदूत ठरले.  अपघात, दंगल, भूकंप, महापूर या परिस्थितीत कर्तव्यापासून कधीच दूर नसणारा वर्दीतला माणूस अर्थात पोलीसच.'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद उराशी बाळगून सामान्य जनतेला सुरक्षित  ठेवण्यासाठीच  असते ही पोलीस सेवा .पोलिसयंत्रणेच्या सेवा अनेकाविध आहेत. झाडावर अडकलेल्या मांजरीला सोडवण्यापासून अतिरेक्यांनी ओलीस ठेवलेल्यांना सोडवणे आणि बँक लुटणाऱ्‍यांचा सामना करण्यासारखी बहादुरी त्यांना करावी लागते. पण एक गोष्ट मात्र खरी, की आधुनिक काळातील पोलिसयंत्रणेचा जन्म झाल्यापासूनच या सेवेबद्दल लोकांच्या मनात अनेक आशा आणि आशंका देखीलआहेत.
      लहानपणी मला पोलिसांचे खूपच अप्रूप वाटायचे कारण ते लोकांना धोकादायक परिस्थितीतून सोडवतात. पोलिस खात्यात माझ्या एका  मित्राची उपनिरीक्षकपदी निवड  झाली.  सुरूवातीला  गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त  भागात   त्याची नेमणूक  झाली.  दररोज तिथे नक्षली लोकांच्या कुरापती चालूचअसायच्या.परिस्थितीने हिंसक वळण घेऊ नये म्हणून काळजी घेण्याचे त्याचे काम होते.  नक्षलींचे क्रूर मनसुबे उध्वस्त करण्यासाठी त्यांचे पोलिसपथक सदैव तयार असायचे.  यामध्ये आलेले यश पाहून  मनाला समाधान वाटते असे ते सांगत.
 या कामात तोचतोपणा नाही,दररोज नवी आव्हाने . बऱ्‍याच लोकांना कल्पना नाही, पण गुन्हेगारीला आळा घालणे हे पोलिसांच्या कामांत केवळ २० किंवा ३० टक्के मोडते. ही मुळात एक समाजसेवा आहे. सर्वसामान्यपणे दररोज आम्ही काय काय करतो याचा आढावा घेतल्यास, आकस्मिक मृत्यू, रस्त्यावरील दुर्घटना, एखादा गुन्हा हाताळणे आणि एखाद्या वाट चुकलेल्या वयस्क व्यक्‍तीला मदत करणे यांसारखी कामे करावी लागतात. खासकरून एखाद्या हरवलेल्या मुलाला सुखरूप घरी पोचवण्यात किंवा गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्‍तीला सांत्वन देण्यात आगळेच समाधान मिळते.
     जगातल्या कोणत्याही भागात आपण रहात असलो तरीसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्ती सर्वत्र आढळते, केवळ सुसंस्कृतपणाच्या पडद्याखाली ती लपलेली आहे इतकेच. पोलिसांच्या संरक्षणाची समाजाला नितांत गरज आहे. अर्थात काही पोलिस अधिकारी स्वतःच निर्दयी, भ्रष्टाचारी, बेपर्वा वृत्तीचे असतात आणि आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात. प्रत्येक ठिकाणी हे कमी जास्त प्रमाणात आढळते पण, पोलिस खाते अशा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांकडूनच  बदनाम होते.ही खाकी वर्दी समाजासाठी आहे.लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी नाही हे आता जाणले  पाहीजे. वर्दीची शान जपलीच पाहिजे.

      दिवाळी ,गणेशोत्सव ,ईद ,मोहरम असो वा रक्षाबंधन असा कोणताही सण  पोलिसांच्या नशिबी क्वचीतच येतो.तुटपुंज्या पगारात सदैव काम करायचं  आणि लोकाना आनंदात सण साजरा करु द्यायच हेच कर्तव्य पोलिस बजावतात . बऱ्‍याचदा अतिशय आवश्‍यक असणाऱ्‍या सेवाही पुरवतात.तरीही पोलीस म्हणजे  एक उपेक्षित आणि गृहीत धरलेला माणूसच राहतो .कधी संप,मोर्चे तर कधी दंगल आणि उरुस यातून तर  त्याची सुटकाच नसते.यांचे सगळे आयुष्य  बंदोबस्त करण्यातच जाते.तरीही कर्तव्य बजावल्यावर  जनतेच्या चेह-यावर जेव्हा आनंद दिसतो तेंव्हा या पोलिस सेवेचा आपणास  सदैव अभिमानच वाटतो.सलाम या वर्दीतल्या माणसाला.
 
- श्रीकृपा
     

मनचली


     

   

हिवाळी
सुट्टीतील प्रसंग.सुट्टीसाठी जाण्याची माझी धावपळ चालू होती.सर्व कार्यालयीन कामकाज आटोपून प्रवासासाठी निघालो.पाच सहा तासाचा प्रवास  सुरु होणार होता. स्थानिक बसने मी बसस्थानकावर पोहचलो.लांबपल्ल्याच्या एसटी  गाड्या  फुल्ल तुडूंब गर्दीने भरलेल्या होत्या.गर्दीमुळे कांही बस थांबत पण  जागा नसलेने लगेच निघून जात.मी ही एक दोन गर्दीच्या बस सोडून दिल्या.जस जसा अंधार हाऊ लागला तसा मी येईल त्या बसने जायचे मनाशीच ठरवले.  कारण बराच प्रवास करायचा होता. दुस-याच दिवशी दिवाळीचा सण  सुरु होणार असलेने गावाकडची मंडळीही वाट पाहत होती. डोळे फलाटाकडे लागले होते.इतक्यात एक बस फलाटावर येऊन थांबली.बसमध्ये ब-यापैकी गर्दी होतीच.काही लोक ऊभे राहून प्रवास करत होते. मी कंडक्टरच्या सीट जवळ उभा राहिलो. कंडक्टरच्या सीटवर  एक प्रवासी बसले होते.तिकिट काढण्यासाठी  कंडक्टर सीटवरुन पुढे सरकले तसे त्यानी मला त्यांच्या जागी  तोपर्यंत बसा म्हणून सांगितले.बस मधील ती गर्दी पाहून तिकीट काढणेसाठी अर्धा  तास तरी लागणार होता याचा  अंदाज बांधला व मी हळूच सीटवर बसलो. 

        घाटातला वळणावळणाचा प्रवास सुरु होता. बसूनच हेलकावे खाणे सुरु होते. त्यामूळे जास्त त्रास  होत न्हवता. तसेच सीटवरील सहप्रवासीही दणकट शरीर यष्टीचा असलेने जागा पकडून होतो.  त्या सहप्रवाशाची  पैलवान सारखी शरीरयष्टी.पायात मोठी सामानाची पिशवी सरकवलेली. हे पाहून  कंडक्टर आल्यानंतर त्यांची जागा खाली करुन द्यावी लागणार हे मी निश्चीत केले होते.  कंडक्टर तिकिट काढून  सीट जवळ आले. परत  एकदा पाठीमागे पाहून जोरात म्हणाले, "आणखी कोण  तिकिटाचं राहीलयं  का?"  कोणताच प्रवासी विनातिकिट राहू नये व आपले काम पूर्ण झाले की नाही   याची खातरजमा कंडक्टरनी केली. मी त्यांच्या सीटवरुन ऊठत होतो.    तोच त्यानी मला "सर, बसा सरकून .गर्दी असल्यावर थोडं असचं कराव लागतं "असे म्हटले.  बारीक शरीरयष्टीमुळे  आम्ही दोघही तिथे सामावलो. बाजूचे  पैलवान प्रवासी मात्र आपली जागा  व्यापून होते. त्यांच्यावर कुठलाच परिणाम झाला  न्हवता. त्याना तसा डोळा लागला होता. त्यांच्याकडे पाहून पाळण्यात जसे गुटगुटीत बाळ  झोपतं तसचं क्षणभर वाटलं. त्याना कोणताही त्रास न  होता मी पुढे सरकून बसलो. 

  काही वेळ कंडक्टरनी आपल्याजवळच्या पैशांचा व सिटचा हिशेब बघून ताळमेळ घेतलाआणि निवांत झाल्याचा श्वास टाकला. आता बस थेट शेवटच्या स्थानकावरच थांबणार होती.बसचाही वेग वाढला. इतक्यात कंडक्टरच्या मोबाईलची रिंग वाजली.एकदोन मिनिटचे त्यांचे संभाषण त्यानी केले. त्यांच्या आगारातील साहेबांचा फोन असावा  हे मी त्यांच्या संभाषणातून  ओळखले.   त्यांच्या  बोलण्यात " हो सायब ,मी मंचली घेऊन निघालो .  मंचली , मंचली.... असे अनेक वेळा  बोलण्यात शब्द आले  होते. 
मी  त्यांचा  फोनवरील संवाद संपताच  विचारले, अहो तुम्ही तर नेहमीची बस घेऊन निघालात पण  ही 'मंचली' कोण? 
"सर, या बसला मंचलीच म्हणतात. म्हणजेच 'मन...चली असे हो." अशी शब्दाची फोड करत मला त्यानी या  नावाविषयी  सांगितले."आमच्या महामंडळाने गर्दीच्या हंगामात अशी बससेवा सुरु केली आहे. दिवाळी सुट्टी, पंढरपूर यात्रा, अशा गर्दीच्या वेळी   प्रवाशांची गरज पाहून   त्याना त्याठिकाणी जाण्यास मदत होईल.खाजगी वाहतुकीने प्रवाशांच्या खिशाला जास्तच भुर्दंड  बसतो. आता आम्ही  येथून रात्रीच पुण्याला निघणार. तिकडून  दिवाळी  सणाला गावी येणारे प्रवासी भरपूर असतात."त्यांच्या विस्तृत माहिती वरून 'मनचली'   या बससुविधेमुळे 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य खरे ठरलेची प्रचिती आली.खरंच ,असाच जीवनाचा प्रवास सुखकर असावा. अगदी 'मनचली'  सारखाच .मनाला हवा हवासा वाटणारा आणि वाटेल तिथं पोहचवणारा.

श्रीकृपा

             
           

नोकरीचा पहिला दिवस



      गावच्या प्राथमिक मराठी शाळेत असतानाची गोष्ट. गुरुजी नेहमीच वर्गात प्रश्न विचारायचे. " मुलांनो, मोठेपणी झाल्यावर तुम्हाला काय व्हायचं आहे?" वर्गातील मुलांची उत्तरे वेगवेगळी असायची. हुशार मुले इंजिनियर, डॉक्टर अशी उत्तरं द्यायची .चोर-पोलिस खेळ खेळणारी मुले 'पोलीस, मिलिटरी मॅन होणार' म्हणून सांगायची. लहानपणापासूनच वर्दीचे आकर्षण त्यांना असायचं .मी इयत्ता सहावीत असताना माझे वर्गशिक्षक गोरे गुरुजींनी मराठीच्या तासाला हाच प्रश्न विचारला होता. माझ्याही वर्गातल्या मुलांनी अशीच उत्तरे दिली.  माझ्यावर जेव्हा उत्तर द्यायची पाळी आली तेव्हा मीही सांगितलं, "मला गुरुजी व्हायचंय" खरं तर, त्या गुरुजींच्या शिकवण्याची पद्धत उत्तमच. त्यांचा पांढरा सदरा, पांढरी पँट असा नेहमीचा   पेहराव. पांढरपेशीच  माणसं ती. आम्हा मुलांना त्यांनी लावलेले प्रेम तर  जास्तच. त्यांच्या या सर्व  आकर्षणाच्या गोष्टींचा प्रभाव माझ्यावर पडला होता. त्यामुळे माझं उत्तर 'गुरुजी व्हायचंय' हे मनात अगोदरपासूनच ठसलेलं.   माझ्या वर्गातल्या भिंतीवर एक वाक्य  लिहिलेलं होतं  ,"माग भिक पण मास्तर की शिक" . हे  वाक्य तर सारखे खुणावत असे. त्या काळची परिस्थितीही तशीच होती.  लवकर नोकरीधंदे मिळत नसत. त्यामुळे मास्तर होण्याचं मनात कोरलेलं .त्या वेळेपासूनच वर्गातील माझ्याबरोबर चे मित्र मला नेहमी 'मास्तर 'म्हणूनच हाक मारायचे . पुढे हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केलं. मी शिक्षक कोर्ससाठी जाण्याचं  ध्येय समोर ठेवलं होतं.  त्यामुळे मी कला शाखा निवडली.तालुक्याला जाऊन अकरावी बारावीचे शिक्षण पूर्ण केलं.  कला शाखेत तालुक्यात अव्वल नंबर  काढला. आता आपले ध्येय पूर्ण होणारच हा आनंद  होता. डीएड़ प्रवेशाचा मार्ग सहज खुला झाला.

       मी दोन वर्षाचा डी एड़ चा कोर्स पूर्ण केला. पण...नोकरी नाही. एक वर्ष खाजगी शिकवणी सुरु केली. कधी मिळणार आपल्याला सरकारी  नोकरी? कधी आपले स्वप्न पूर्ण होणार ? असे नेहमी मनात प्रश्न सतावत रहायचे. 2001 साल संपत आलेले.  दिवाळी सणानंतर वर्तमानपत्रात जाहिरात आली .ज्या शिक्षकभरतीची वाट पाहत होतो ते दिवस उजाडले होते. सरकारनेही 'शिक्षणसेवक ' असे गोंडस नाव  ठेवले होते. कंत्राटी भरती. काहीही असो, पण  अगोदर नोकरी मिळवली पाहिजे .त्यामुळे  अर्ज करायला सुरुवात केली. आपल्या कोल्हापुर जिल्हयात आमच्या जातीचा कोटा शिल्लक नव्हता.मी दोन -तीन  जिल्हयात अर्ज केले. पहिल्यांदा कोणत्या ठिकाणावरुन कॉल  येईल तिथे  जायचं हे ठरवलं. शेवटी स्वतःच्या जिल्हयात नोकरी करण्याची इच्छाच विझली होती. 

       पहिल्यांदा  रत्नागिरी जिल्ह्यातून  मुलाखतीस बोलावले.  नोव्हेंबरच्या महिन्यात मुलाखत झाली. मुलाखती नंतर जवळ जवळ एक महिना उलटत आला. डिसेंबर महिनाही संपत आला. मी नियुक्तीच्या पत्राची वाट  पाहत  होतो. अखेर डिसेंबरची 20 तारीख.  दुपारची वेळ. मी नुकताच  शेतातून आलो होतो. इतक्यात दारात पोस्टमन हजर. पोस्टमनने मला पत्र हातात  दिले व अभिनंदन केले. पत्र हातात  घेतले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील शाळा  मिळाली होती- जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा मोसम नं 1.  मनोमन आनंद झाला होता. आता आपला आनंदी   'मोसम 'सुरु होणार होता.  पण  मनात विचारचक्र सुरु झाले. आपल्याकडील  खेडगावातील शाळांची नावे ..जीवन शिक्षण विद्या मंदिर ...अशा नावाने सुरु असतात. कदाचित मोठे गाव असेल की काय? तिथे अनेक शाळा असतील ...म्हणूनच त्याना 1नंबर, 2नंबर  असे नंबर दिले असतील तर मग! असे अनेक मनात तर्क-वितर्क सुरु झाले होते.  

        माझ्या गावाजवळच्याच  विनायक नावाच्या मित्राला संपर्क केला. त्यालाही तोच तालुका मिळाला होता. दुस-या दिवशी  जाण्याची तयारी सुरु केली.डोक्यात विचाराचं  काहूर माजलं होतं . रात्रभर झोप लागत नव्हती. एकीकडे आनंद  त्याच बरोबर नवीन ठिकाणी जाण्याची हुरहुर.आयुष्यात प्रत्येकजण  आपल्या उपजीविकेसाठी धडपडत असतो. कधी एकदा नोकरी धंद्याला पोरगं लागेल या विचारात मायबाप असतात. त्यानी त्यांची स्वप्नं आपल्या पोरांच्यात पाहिलेली असतात. त्यासाठी आयुष्यभर त्यानी खस्ता खालेल्या असतात. आता ते त्यांच स्वप्नपूर्ण होण्याचा दिवस उगवणार होता आणि  तो दिवस माझ्या आयुष्यात उगवला. शुक्रवार.  दिनांक 21 डिसेंबर 2001.नोकरीचा पहिला दिवस म्हणजे मनात बरेच प्रश्न, उत्सुकता, धाकधूक, थोडंसं टेन्शन, नवीन नोकरीचा आनंद... असं सगळं होतं. तरीही आयुष्यात पहिल्या गोष्टी खूप स्पेशल असतात. पहिला पाऊस, पहिलं प्रेम, पहिली शाळा, पहिले शिक्षक, पहिलं नोकरीचं  ठिकाण वगैरे वगैरे सगळीच पहिलाई!....आणि  हृदयात असणारी पहिलेपणाची अपूर्वाई.

      आज मुलगा नोकरीला जाणार म्हणून आईने सकाळी लवकरच उठून डबा  बनवला. सकाळची पहिली कॉलेज गाडी म्हणजेच  वस्तीची  एसटी बस  पकडली. सोबत मित्र विनायक होता. गाव ते गडहिंग्लज. गडहिंग्लज  ते कोल्हापूर  असा प्रवास झाला. कोल्हापूर  बस स्टँडवर चौकशी केली. राजापूर जाणारी बस किती वाजता आहे? किती तास  प्रवासाला वेळ  लागतो? जवळजवळ  दीड -दोनशे किलोमीटरचा प्रवास अजून बाकी होता. पहिल्यांदा तालुक्याच्या ऑफीसला हजर व्हायचं होतं. त्यामुळे   दहाची कोल्हापूर - राजापूर ही बस  पकडली. वाटेत बस मध्येच बसून डबा खाल्ला.  घाटात वळणावळणाचे रस्ते पार  करत बस दुपारी अडीच-तीनच्या सुमारास राजापूरात पोहचली. 

      तालुक्यात पंचायत समितीला हजर झालो. तेथून  कार्यालयीन कामकाज आटोपून आम्ही शाळेत हजर होण्यासाठी  निघालो.  शाळा  सुटायच्या आत म्हणजेच पाच वाजेपर्यंत तिथं पोहचणं गरजेचं  होतं. राजापूर बस स्थानकात चौकशी केली. माझा व मित्राचा  शाळेचा मार्ग वेगळा होता. मित्राला बस मिळाली. माझा शाळेपर्यंतच्या प्रवास अजून दीड दोन तासाचा  होता.  गावात  जाणारी थेट बस नव्हती.  मी पावणे चारची  राजापूर -खारेपाटण  बस पकडली.  साडेचार वाजेपर्यंत बस खारेपाटणला पोहचलो. तिथे चौकशी केली तर शाळे पर्यंत जाण्यासाठी रिक्षा शिवाय पर्याय नव्हता. रिक्षा केली. तोही प्रवास अर्ध्यापर्यंतचा. खारेपाटण ते मोसम हॉटेल  हा दहा मिनिटाचा प्रवास रिक्षाने  संपला. जवळच एक शाळा होती.  मला वाटले आली  आपली शाळा. शाळेचे नाव पाहतो तर  प्राथमिक शाळा  मोसम नं.2.  तिथे असणा-या मुख्याध्यापकांनी मला कच्च्या रस्त्याने  1 नंबर शाळेकडे जाण्यास सांगितले. 

       मी ती वाट  तुडवत निघालो. वाटेत ना माणसं दिसत होती ना घरे. थोड्या अंतरावर गेल्यावर दोन मंगलोरी कौलाची  उतरत्या छप्पराची घरे दिसली. तिथे अंगणात दोन माणसं दिसली. मी त्याना शाळेबद्दल विचारले.  ते म्हणाले, "अहो ती माळावरची शाळा  काय? या घाटीने (ऊंच डोंगरातील  वळणाची पायवाट) सरळ उतरा.पूढे  एक वाडी लागेल तिथून  जा."   माझा सर्व भ्रमनिरास  झाला  होता. आदल्या रात्रीला केलेले सर्व तर्क वितर्क  साफ चुकले होते. एका खेडेगावात  ही शाळा  होती. शाळेपर्यंत जाण्यास पायवाटेचाच पर्याय होता.  मी घाटी  उतरु लागलो.लाल धुरळ्याची वाट  संपते कधी असे झाले  होते. पूढे  उतरत्या छप्पराची सात आठ  घरे दिसली.  त्या वाडीत एका माणसाला विचारले त्यानी  पायवाटेने जाण्यास सांगितले. मी वाडीतील एका घराजवळच घुटमळलो. पाठीवर निळी पिशवी. डोक्यावर टोपी. हातात  रुमाल, घामाघूम चेहरा , अंग भिजलेलेलं . असा माझा अवतार पाहून  वाडीतील कुत्रीही भुंकू लागली. तिथल्या एका माणसाने  कुत्र्याना हटकलं . मला  पायवाटेने सांकवापर्यंत  (ओढ्यावरचा लहान लाकडी पूल) सोडलं व या घाटीने जा म्हणून सांगितले.   ऊंच अशी डोंगरातील पाऊलवाट , दोन्ही बाजूने  दाट करवंदाची जाळी,मध्येच आंब्या काजूची झाडे दिसत होती.  घाटी चढल्यावर  माळ  लागला.एक दोन गुराखी दिसले. त्याना शाळे विषयी विचारले . त्यापैकी एक म्हणाला, " आता शाला सुटूचा  टाईम झाला.  एक गुरूजींका याचं  वाटेनं  येऊचा लागता . वाटेक  तुमका  भेटतील. "  माझ्या कानावर त्यांच्या मालवणी भाषेतील बोल पहिल्यांदाच कानावर पडले . मी सपासप वाट संपवत गेलो. शाळेची घंटा कानावर पडली. मी धावत सुटलो. समोर शाळेची  इमारत दिसली. मुले दफ्तर घेऊन मैदानावर पोहचली होती.कांही अजून शाळेजवळच घुटमळत होती. मला पाहताच कांही मुले गुरुजीना सांगायला धावत सुटली.  एक गुरूजी व बाई आवराआवर करत होत्या. मी त्याना  हजर होण्यासंबंधी  सांगितलं. पाण्याचा तांब्या माझ्या हातात  दिला. मी  थोडं पाणी पिऊन उरलेलं तोंडावर मारलं.  मुख्याध्यापकांची चौकशी केली. ते कांही  ऑफीसकामानिमित्त लवकर  शाळेतून निघून गेले होते. गुरुजीनी आजच्या तारखेस हजर करुन घेतले. उद्या मुख्याद्यापाक  आले की रिपोर्ट  करु. तुम्ही काही काळजी करु नका असे म्हणाले.

    शाळा  सुटूनही थांबलेली सर्व मुले माझ्याकडे पाहत  होती.नवीन गुरूजी आले आहेत असे त्याना बाईनी सांगितले.बाई मला म्हणाल्या, "येथून वस्ती लांब आहे म्हणून आम्ही  पाच मिनिटे लवकरच निघत असतो. पण  आज कांही मुलं, चारच्या सुमारास लहान सुट्टीत बोरं काढायला जंगलात  भिकार टेंबलीकडे (स्थानिक टेकडी ) गेली होती. त्याना  आताच शोधून आणलं. त्या मुलाना शिक्षा म्हणून पाच मिनिटे  वर्गात  बंद केले होते. तुमचं नशीब चांगलं. नाही तर आम्ही  तुम्हाला वाटेतच भेटलो असतो." खरं तर  माझं नशीब चांगलच होतं.माझ्या नशीबातील तो सुवर्णदिवस होता. 
        शाळेच्या आजू बाजूला डोंगर होते. शाळेजवळ एक दोन घरं दिसत होती.   दुस-या दिवशी शनिवार असल्याने सकाळची शाळा  होती. माझ्यासमोर त्या दिवशी वस्तीला राहण्याचा प्रश्न होता. बाई शाळेच्या गावातच  एका वाडीत राहत होत्या.त्यानी  त्या दिवशी माझ्या राहण्याची सोय केली.  वाटेतून  जाताना  राहण्यास खोली करण्याची  सोय कुठे होईल  काय याची  चौकशी सुरु केली.  त्यानी माझ्या  जातीची विचारपूस केली. त्या म्हणाल्या, " आम्ही सुशिक्षित याचा  विचार करत नाही हो , पण  इकडे जुने  लोक  अजूनही विचार करतात." जातीच्या निकषामुळेच मला  पर जिल्हयात नोकरी करण्याची वेळ  आली  होती. जी कधीच आपल्या पासून जात  नाही  ती 'जात'  असते.  हा जातीचा पगडा  शिक्षणाच्या माध्यमातून दुर करुन   'माणूस' तयार करण्याचे आव्हान माझ्यासमोर  आता  होते  आणि  ते मी पहिल्या दिवसापासूनच स्विकारलंही.
  
- श्रीकृपा


Saturday, June 13, 2020

चला मराठी बोलूया



   


काल परवा मला एक माझा पुण्यातील  मित्र भेटला. अनेक वर्षानी भेटल्यावर आमचे संभाषण सुरु झाले .त्याच्या आणि माझ्या अर्ध्या तसाच्या संभाषणात जवळ जवळ अर्धा टक्के भाग तो इंग्रजीतील शब्द वापरत गेला.मी म्हटलं,"अरे तुझी कुठे नोकरी आहे?
तो म्हणाला," मी एका मोबाईल कंपनीत ग्राहक केंद्रात असतो." त्याला त्याच्या दररोजच्या इंग्रजी बोलण्याची एवढी सवय झाली होती की तो आपली मातृभाषाच विसरत चालला होता.

    

     आजकाल इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्यास  प्रत्येक पालक महत्व देतो  पण ,   मातृभाषेतून पुरेसा विकास झाल्याशिवाय इंग्रजीसारख्या परकीय भाषेतून सर्वसामान्य मुलांना शिक्षण देणं शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे. इथं हे स्पष्ट करायला हवं, की हा मुद्दा कुणाच्या मताचा नाही. मातृभाषेच्या प्रेमाचाही नाही. शास्त्र या संदर्भात काय सांगतं, हेच फक्त महत्त्वाचं आहे. या संदर्भात काय सांगणं, हेच फक्त महत्त्वाचं आहे. या संदर्भात जगभर ते संशोधन झालं आहे, सुरू आहे त्या साऱ्याचे निष्कर्ष अगदी स्पष्ट आहेत. 

वेद या अभ्यासकानं १९८३मध्ये केलेल्या संशोधनातून पुढील निष्कर्ष मांडले आहेत. दुसरी भाषा शिकताना अनौपचारिक (तोंडी संभाषणापुरत्या) पद्धतीनं शिकल्यास मेंदूचा गोलार्ध मदतीला येऊन जुजबी रीतीनं ती भाषा शिकता येते. (त्यात उच्च बौद्धिक क्रियेचा समावेश नसतो.) आपली मुलं ‘जॅक ॲण्ड जिल’ वगैरे बालगीतं म्हणतात व इंग्रजी भाषेचा केवळ मौखिक परिचय करून घेतात. ती क्रिया वरवरची व सोपी असते. प्रत्यक्ष औपचारिक शिक्षणात डाव्या गोलार्धावरच वैचारिक भार पडतो. त्यामुळं मेंदू थकतो. परभाषा शिकताना वय हाही महत्त्वाचा घटक ठरतो. वय वर्षं १०पर्यंत मूळ मातृभाषा प्रगत झाल्यावर परभाषा शिकणं सुलभ होतं. 

    एखादा माणूस इंग्रजी भाषेत बोलू लागल्यावर काही जण त्याला... खूपच हुशार समजतात...आपण काहीतरी वेगळे आहोत अशीही भावना इंग्रजी भाषेत फडफड बोलणारे काही जण अवास्तव ठेवतात. वास्तविकता वेगळी असतें. हे इंग्रजी येणारे , इंग्रजीचा आग्रह धरणारे लोक ना मराठीत पुढे जातात ना इंग्रजीत.ते केवळ बोलण्याच्याच पातळीवर थांबतात.

      ख-या अर्थाने एखादी भाषा अवगत होणे म्हणजे त्या भाषेची सर्व अंगे आत्मसात करणे होय.कोणत्याही भाषेची सुरुवात श्रवण म्हणजे ऐकणे पासून होते.आपण श्रवण, भाषण ,संभाषण,लेखन अशा पायरीने भाषा अवगत करण्याचा प्रयत्न करतो.परंतू जेंव्हा आपण आपले सर्जनशील विचार लेखनातून अथवा संभाषणातून  व्यक्त करतो तेंव्हा त्या भाषेची सर्वोत्तम जाण असल्याचे दिसून येते.त्यामुळे केवळ बोलण्याच्या पातळीपर्यंत एखाद्या भाषेचा अभ्यास न करता ती सर्वोत्तम पातळी  अवगत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
            
      
     खरंतर मी   लिहितो, कारण की मला बोलण्यापेक्षा लिहिण्यातून व्यक्त होण आवडतं .कोणत्याही व्यक्तीची विचार करणेची सुरुवात ही त्याच्या मातृभाषेतूनच होते तशीच माझी मराठीतूनच होते. माझ्या भावना,जीवनानुभव अविस्मरणीय क्षण हे कधीकधी आपली लेखणीच्याद्वारे एखाद्याच्या आयुष्याला अविस्मरणीय कलाटणी देऊन जाऊ शकते. कधी ती मदतनीस म्हणून तर कधी ती मार्गदर्शक म्हणून काम करत असते. लिहीत असताना आपण स्वतःचा विचार तर करतोच करतो पण, आपण आपल्या व्यतिरिक्त समाजाचा आणि आजूबाजूला होणाऱ्या चांगल्या वाईट छोट्या-मोठ्या घडामोडींचा आपण विचार मांडत असतो. लेखन ही एक नशा असते. ती नेहमी लिहिण्यासाठी प्रवृत्त करत असते .त्यामूळेआपण अखंडित लिहिते झाले पाहिजे. जसा आपण आपल्या मातेचा अभिमान बाळगून तिची सेवा करतो तशीच सेवा आपल्या मराठी भाषेची करायला हवी. .तर ...आणि तरच ....माय मराठी  जगेल आणि  वाढेलही. चला तर आपण आजपासून माय मराठीतच बोलूया.

-श्रीकृपा 



आयुष्याची कातरवेळ



"अण्णा,आज फिरायला जायचे ना?"

"हो जाऊ ,थोडा फ्रेश होतो मग लगेच निघू."

"अण्णा , मी ही थोडा चहा घेतो आणि मग जाऊ"

     अंतू अण्णा आणि माझ्यातला हा  नेहमीचा संवाद. शाळा सुटली की घरी येऊन थोडया वेळाने सायंकाळी आम्ही फिरायला निघायचो. फिरत फिरत आम्ही नेहमीप्रमाणे बंधा-या पर्यंत पाय मोकळे करून येतअसे..कधी कधी जवळच असणा-या मंदीरात थोडावेळ बसुनही गप्पा व्हायच्या.अंधार व्हायच्या आत आम्ही पुलाजवळ्च्या दुकानापर्यंत पोहचत असू.

        दुकानाच्या कट्ट्यावर सन्ध्याकाळी फिरत फिरत नेहमी येणारी ज्येष्ठ मंडळी बसलेली असायची. दुकानाशेजारीच रहाणारे पांडू  तात्या, काठी टेकत टेकत विडीसुपारी आणायला  येणारे जाबर - राजाराम तावडे ,तसेच आपले  दिवसभराचे रोजनदारीचे  कांमआटोपून मारुती अण्णा, श्री तावडे  व विलास अशी मंडळी गप्पा मारत बसायची.

आम्हा दोघाना पाहून "या गुरूजी. जरा थोडा वेळ बसा."अशी नेहमी हाक असायची. 

अन्तू आण्णा दुकानातील थोडे चणे घेऊन सर्वांच्या हातात थोडे थोडे देत.चणे खात खात थोड्या गप्पा रंगात येत असत. कधी पाऊस पिकांच्या,तर कधी वाडीवस्तीतील सुख -दुखाच्या गप्पा होत.शेजारचे शिवराम अण्णा आपल्या गायगुरांची कांम आटोपून कधितरी वेळ काढायचे.

         त्या दिवशी मी एकटाच फिरून आलो होतो.अंतू अण्णा गावी गेले होते. मावळतवाडीतीलही काही मंडळी दुकानावर आली होती.शिवराम अण्णा आपले शेतीचे कांम आटोपून घराकडे चालले होते.

मी आण्णा ना हाक दिली."नमस्कारअण्णा ,"

आण्णाही नेहमीप्रमाणे दोन्ही हात कोपरापर्यंत जोडून मला म्हणाले, "नमस्कार गुरूजी,काय कस काय चाललय?"

त्यांच्या या नेहमीच्याच प्रश्नाला मी म्हटले,"आण्णा मस्त चाललय,  आज काय तुम्ही निवांत आहे?"

"निवांत कुठला,आत्ताच वासराला चार घेऊन आलो."

अण्णांच्या गप्पा सुरु झाल्या.कधीकाळी मुंबईत घडलेले गमतीशीर प्रसंग सांगायला आण्णानी सुरुवात केली.सर्वजण तो प्रसंग ऐकण्यात दंग झाले. मावळतवाडीतील काशा तात्या, मारुती अण्णा, डॉक्टर नाना ,मुंबईहून आलेले विजुभाऊ अशी सर्व मंडळी शिवराम अण्णांच्या हावभावाकडे  टक लावून बघत होती. सर्वांचेच मनोरजंन त्यातून व्हायचं आणि हास्यकल्लोळ माजायचा. कधी कधी हे जीवनांबद्दल अनुभव खूप काही शिकवण देऊन जायचे.

     आज गावाकड माणसांची खुपच कमीआहे. नोकरीधंद्याच्या निमित्ताने तरुण मुलानी मुंबई,पुण्यातच संसार मांडलेले.गावात म्हातारे आईबाप आणि एखादा शेती कसणा-या भावाचेच कुटुंब. आयुष्यभर कष्ट करून  ही ज्येष्ठ मंडळी आयुष्याच्या सन्ध्याकाळी मन रमवायचा प्रयत्न करतात. कोणाचे शरीर शेती धंद्यात काबाडकष्ट करुन आज थकलेले तर कोणाचे ओझी उचलून मणका झिजलेले.उतारवयात  मुले विभक्त राहून संसार थाटल्याने काही जणांची  तर फारच परवड होते. आयुष्यात प्रत्येक माणसाची ही
कातरवेळ आनंदी, आरोग्यादायी  गेली पाहिजे असे वाटत असेल तर या ज्येष्ठा पासून कधीच दुर होऊ नये. त्यांचा आयुष्यभर सांभाळ करावा.तरच आपली येणारी पिढी आपला विचार करेल.

    
   न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा।

  वृद्धा न ते ये न वदान्ति धर्मम्।।

       ज्या सभेत वृद्ध, अनुभवी लोक नसतील ती सभा नव्हे. जे धर्म सांगत नाहीत ते वृद्धच नव्हेत.अशा प्रकारे महाभारतात वृद्धांचा गौरव केलेला आहे. तोच वारसा आपण पुढे चालवला पाहिजे.



श्रीकृपा 

 


थोडे की जरुरत है






सायंकाळची वेळ.सुट्टीचा दिवस. निवांत क्षण.अंगणा मध्ये खुर्ची टाकून आकाशवाणीवरील गाणी ऐकत मी बसलो होतो.

"थोडा है ,थोडे की जरुरत है,
जिंदगी फिर भी यहां खूबसूरत है " 

हे आकाशवाणीवरील गाण्याचे बोल माझ्या कानावर पडत होते. गाण्यातील हे बोल बरचं काही मनाला सांगून जात होते.खरंच,माणूस हे सुंदर जीवन जगतो का?का बरं तो इतर भौतिक गोष्टीच्या पाठीमागे लागतो? त्याला जीवनाचा अर्थ का बरं कळत नसेल? असे नाना प्रकारचे प्रश्न मनात घोंगावू लागले.

    माणसाला जीवनामध्ये 'थोडं' म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडलेले नाही .प्रत्येक माणसाने त्याचा वेगवेगळा अर्थ लावला आहे. जे काही आपल्याजवळ ईश्वराने दिलेले 'थोडं 'आहे त्याचा अजूनही माणसाला शोध लागलेला नाही.म्हणूनच ,माणूस अजूनही 'थोडं' काही कमवायचंआहे.  याच्यासाठी नेहमीच धडपडत असतो.कमवायचं आहे म्हणून आयुष्यभर सैरावैरा धावत सुटतो. त्याची 'थोडं 'भरलेली झोळी काही पूर्ण भरली जात नाही.आहे त्याचा उपभोग घ्यायचा सोडून तो झोळी पूर्ण भरण्याचीच वाट पाहतो. 
म्हणूनच, कविवर्य मंगेश पाडगावकर आपल्या 
'सांगा कस जगायच?' या कवितेतून आपल्यालाच म्हणतात,

पेला अर्धा सरला आहेअसं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहेअसं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

        आहे त्या थोडके पणात जीवन आनंदाने जगणारी माणसे या जगामध्ये आहेत. त्यांना आपण अल्पसंतुष्ट म्हणून हिणवत असतो, पण ज्या लोकांनी 'थोडं 'आहे त्यात जगणं पसंत करून समाधानाची पातळी गाठली आहे त्यांना निश्चितच सुख मिळत जाते.

    आज माणूस भौतिक सुखाच्या पाठी लागून मानसिक स्वास्थ्य हरवून बसला आहे . आज माणूसआपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करुन तरुणपणात पै-पै जमा करतो आणि म्हातारपण सारं दवा घेण्यात जातं. पैसा -पैसा म्हणून धावणारे हे माणसाचं हव्यासी मन कधीच समाधानाची पातळी गाठू शकत नाही. माणसाने आपल्या गरजांवर नियंत्रण ठेवून आपल्या  सुखाची व्याख्या ठरवली पाहिजे.  निरोगी शरीरात निरोगी मन वास करत असते हे नेहमी आपण ऐकत असतो .आज आपल्याला जे काही 'थोडं' कमवायच बाकी आहे  त्यामध्ये निश्चितच निरोगी मन, निरोगी शरीर हेच असले पाहिजे.तरच  जीवन सुंदर आहे त्याचाआस्वाद घेता येईल. 

श्रीकृपा 

          

                    



प्रशंसा आणि कौतुक




  'प्रशंसा 'ही माणसाला थोड्या कालावधीसाठी सुख देणारी गोष्ट असते. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याची प्रशंसा करतात. मी कॉलेज करत असतानाची गोष्ट. प्राध्यापक महाशयांनी   आम्हाला हिंदी मधून एक पाठ शिकवला- 'चाटूकारिता भी एक कला है '. 'चाटूकारिता' म्हणजे प्रशंसा.  या पाठातील एक प्रसंग आजही  मला आठवतो.  एका पानपट्टीच्या टपरीत एक माणूस रोज पान खाण्यासाठी येत असे. टपरीवाला त्याला आपल्या हात चलाखीने पान मसाला बनवून देत असे. तो माणूस पान खाऊन झाल्यावर "वा! काय पान  आहे," तुझ्या  हातचे पान खाण्यात खूपच मजा वाटते." असे नेहमी टपरीवाल्याची तो   प्रशंसा करत असे.
काही दिवसानंतर त्या माणसाला टपरीवाल्या कडून  फुकटची पाने मिळू लागली. प्रशंसेची माळ नेहमी गळ्यात पडू लागल्याने टपरीवाला अशा माणसांवर नेहमी खुश असायचा, पण आणखी काही दिवसानंतर त्याचा धंदा कमी होऊ लागला व एके दिवशी ती टपरी
बंद पडली.


       एखाद्याने केलेल्या प्रशंसेचा आनंद कोणत्या पातळीपर्यंत  घ्यायचा आहे हे ज्याचे त्याने ठरविले पाहिजे. आपल्या समोरील माणूस आपली प्रशंसा का करतो? किती वेळा करतो? याची पारख आपल्याला करता आली पाहिजे . आपल्या मराठी भाषेत याला  'हरभऱ्याच्या झाडावर चढवणे' असे म्हणतात.अशा लोकांची आज कमी नाही. यातून प्रशंसेचे स्वार्थी रूप दिसते.


     प्रशंसा आणि कौतुक हे अर्थाच्या दृष्टीने जवळचे शब्द वाटतात.  पण, कौतुक आपले तेव्हाच होते जेव्हा आपल्याला यशप्राप्ती मिळते.  कोणत्याही कामात यश प्राप्त झाल्यास कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडत असते. त्यामुळे आपल्याला पुढील कार्य करण्यास प्रेरणा मिळते. म्हणजेच,' कौतुक' हे नेहमीच प्रगतीकडे नेण्यासाठी मदत करत असते यामध्ये स्वार्थाचा अंश कमी दिसतो. तसेच, कौतुक करणे हे मनाचे मोठेपण दाखवते. दुसऱ्याच्या यशाचा आनंद जर झाल्यास आपल्या विशाल मनाचा मोठेपणा दिसून येतो.


   आजच्या या जगात स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याची प्रशंसा करून लुबाडणा-यांची संख्या काही कमी नाही. दुसऱ्यातील चांगल्या गोष्टींचे 'कौतुक ' करून प्रेरणा देणा-यांची आज कमतरता भासते . आपण केलेल्या कौतुकाने दुस-याच्या  यशाची पताका कशी फडकत राहील ही अपेक्षा करणाऱ्यांची तर आज वानवाच . कारण ,आजच्या समाजात जसे खुल्या मनाने जगणारी माणसे आहेत तसेच खेकडा प्रवृत्तीची ही माणसे आहेत ही दोन्ही रूपे निस्वार्थी कौतुकाची व स्वार्थी प्रशंसेची दिसून येतात.
    
                              
                            

श्रीकृपा


आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...