Wednesday, July 8, 2020

गुरु आपल्या दारी

गुरु आपल्या दारी


          आज गुरुपौर्णिमा.प्रथमत:सर्वाना वंदन.
 सध्या कोरोनाच्या महामारीमुळे  सर्वत्र शाळा  बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा बोलबाला चालू आहे. पण, जिथं नेटवर्क नाही  अशा वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांचं काय? त्याना प्रत्यक्ष गुरुशिवाय कोण  मार्ग दाखवणार? आपल्या आयुष्याला  योग्य वळण लावायचे असेल,योग्य संस्कार करायचे असतील तर गुरूच्या सान्निध्याशिवाय सर्व काही अशक्यच! म्हणूनच म्हंटलं जातं.  

   आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर वाट 
         गुरुविण कोण  दाखविल वाट 
          या अंधारी दिशा न कळती 
            नसे आसरा,नसे शिदोरी
कंठ दाटण्या आला भरुनी लोचन काठोकाठ
          गुरुविण कोण दाखविल वाट.

      गेल्या महिन्यात  विद्यार्थ्याना पुस्तकं घरी पोहचली. नव्या पुस्तकांचा गंध  घेत मुलानी स्व-अभ्यास सुरु केला. दरम्यान मुलांच्या अभ्यासाविषयी माझ्या  सहका-यां मार्फत विद्यार्थी भेटी  घेतल्या.  अभ्यासाबरोबर कोरोना बाबत कोणती काळजी घ्यायची हेही विद्यार्थ्यापर्यंत पोहचले.  शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू राहिलं. ब-याच दिवसानी आपली गुरुजन मंडळी दिसल्यावर त्यानाही आनंद झाला.  

   आजची भेट विद्यार्थ्याना थोडी अनपेक्षितच.  गुरुपौर्णिमेदिवशी गुरूच आपल्या दारी आल्यावर  ते ही अवाक् झाले.    कोण शेजारच्या मित्रा समवेत खेळत होतं ,कोण  घरी टिव्ही पहात  होतं, कोणी घरकाम करत होतं तर कोणी शेतात लावणी करायला गेलं होतं.  थोड्या वेळातच कांही विद्यार्थ्यानी आपला आठवड़यातील अभ्यास दाखवला. तर  कांहीनी  आपण गोष्टीची कोणती पुस्तके वाचली याबाबत गप्पा मारल्या.   आपल्यापेक्षा वयाने मोठया असलेल्या मित्रांबरोबर कांहींजण  अभ्यास करत असल्याचे दिसले. मुंबईहून आलेली कांही सुशिक्षीत मंडळी  आपल्या मुलांसोबत या विद्यार्थ्यांचाही अभ्यास घेत असल्याचे समजले. त्यामुळे  समाधान वाटले.

     सध्याचा काळ  कठीण आहे. मुलांसाठी तर जास्त काळजीचा. वर्तमानपत्रात विद्यार्थ्यांच्या नैराश्यामुळे  वाईट घटनांच्या बातम्या वाचल्यावर तर  मन अधिकच अस्वस्थ होतं.   आपल्याला खेळायला पुरेसे सवंगडी नाहीत,  कामात व्यस्त असल्याने आपल्यासोबत वेळ  द्यायला आपले आई-बाबा नाहीत.बाहेर  जावं तर कोरोनाची भीती. अशा वेळी  गुरूचं आपल्या  घरी काही क्षण आले तर.. कोणाला आनंद होणार नाही!   म्हणूनच आजच्या भेटीचे प्रयोजन केले होते. मुलांच्या मनातलं एकटेपण निघून जाईल हाच एक ऊद्देश. संकट काळात बळ देणारे हात हवेत. धीर देणारे श्वास हवेत. म्हणूनच कुसुमाग्रज यांच्या ' कणा ' या कवितेतील विद्यार्थी गुरुला म्हणतो .

'पैसे नकोत  सर , जरा एकटेपणा  वाटला -
मोडून पडला संसार तरी, मोडला नाही  कणा
पाठीवरती हात ठेवून  नुसते लढ म्हणा.'

       ज्ञानाच्या  या महासागरात  आपली जीवन नौका  गुरुशिवाय  मार्गक्रमण करुच शकत नाही. म्हणूनच गुरूचं स्थान अनन्यसाधारण आहे.आपलं आयुष्य आपल्यालाच जगावं लागतं , कितीही संकटे आली  तर त्यावर मात  आपणच करावी लागते.  यावेळी गुरूने दिलेली शिकवणच अशी आव्हाने  पेलायला  बळ देते. अशा बळ देणा-या माझ्या  प्रत्येक गुरुला आजच्या या गुरुपौर्णिमेनिमीत्त त्रिवार वंदन!!!

- श्रीकांत पाटील
skplanj@gmail.com

No comments:

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...