गुरुजींचं स्वागत🎉🌷🌹
२०२४ सालचा शेवटचा आठवडा. नव्या वर्षाची चाहूल सर्वांना लागली आहेच! माझ्या मराठी विद्यामंदिर मौजे जट्टेवाडी, (ता.चंदगड, जि. कोल्हापूर) शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनाही हा शेवटचा आठवडा उत्सुकतेचा होता, कारण याच आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना चाहूल लागली होती शाळेत नवे गुरुजी येण्याची! आणि शेवटी तो पवित्र दिवस उजाडला. २४ डिसेंबर. सव्वाशे वर्षापूर्वी याच दिवशी आपल्या महाराष्ट्रात सानेगुरुजींचा जन्म झाला . अशा मंगल दिवशी नव्या शाळेत रुजू होणं व मुलांना गुरुजी मिळणं हे दोघांचंही भाग्यंच!
पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक , ग्रामस्थ, शिक्षकमित्रपरिवार यांनी माझं स्वागत केलंच .पण मुलांना उत्सुकता होती नवे गुरुजी कोणत्या वर्गानां शिकवणार? म्हणजेच ते कोणाचे वर्गशिक्षक होणारं? दुसऱ्या दिवशी नाताळची सुट्टी होती तसेच आठवडाभरात वार्षिक शाळातपासणीही तोंडावर आलेली. त्यामुळं वर्गनियोजन करणं आवश्यक होतं. त्याच दिवशी सायंकाळच्या सत्रात आम्ही वर्गनियोजन पारं पडलं. मुख्याध्यापिका सुतार मॅडमनी मला सहविचारने इ. तिसरी व चौथीचा वर्ग दिला. शाळा सुटली . पण मुलांना त्यांना कोण वर्गशिक्षक मिळणार याची त्यादिवशी कल्पना नव्हती.
नाताळच्या सुट्टीनंतर २६ डिसेंबरला मुले शाळेत आली . ठरल्या वेळेप्रमाणे परिपाठ झाला. एका वर्गखोलीत पहिली -दुसरीचे वर्ग बसायचे व दुसऱ्या वर्गखोलीत तिसरी -चौथीचे. दोन्हीही वर्गखोल्या स्वतंत्र इमारतीत. मी हजर होण्यापूर्वी महिनाभरासाठी याच वर्गावर एक शिक्षिका होत्या. त्याही पाटील बाईच! पण आज मुलांना कायमस्वरुपी गुरुजी मिळणार होते अन् तेही पाटील गुरुजीच! त्यामुळे सर्वच खूश.
मी वर्गावर जाण्यास निघालो. वर्गाचा दरवाजा काही अंशीच उघडलेला. आत प्रवेश करताना दरवाजाच्या आडोशाला कोणीतरी विद्यार्थी ऊभे असल्याचे मला दिसले. मला वाटले वर्गाच्या कोपऱ्यातील कचराटोपलीत कागदाचे कपटे टाकण्यास कोणीतरी उभा असेल. मी वर्गाचा उंबरठा ओलांडला. आत पाय टाकताच सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात " वेलकम सर ! " म्हणत माझ्या अंगावर गुलाब पाकळ्यांची वृष्टी केली. आनंदाने नाचत टाळ्या वाजवल्या. मी केवळ त्या गुलाबांच्या पाकळ्यात न्हाऊन गेलो नाही तर त्या विद्यार्थ्यांच्या प्रेमाने न्हाऊन निघालो. असं स्वागत मी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो. मला सर्व मुलांनी खुर्चीजवळ नेलं. टेबलावर कांही पांढरे व कांही लाल गुलाब होते . ते माझ्या हातात देत माझं स्वागत व अभिनंदन केलं. मी मुलांच्या प्रेममय स्वागताने भारावून गेलो.
मी मुलांना विचारलं, "मुलांनो , माझं अशाप्रकारे स्वागत करायला तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला हे कसं सूचलं? कोणी पालक वा शिक्षकांने सांगितलं की काय?"
मुले म्हणाली, " असं काहीच नाही. हे वर्गातील सर्वांनीच अगोदर ठरवलं होतं. पायल, स्वरा, आरुशी यांनी फुलं आणली, कांही फुलांच्या पाकळ्या काढल्या व आम्ही तुमचं स्वागत केलं. खरंच, मुलं म्हणजे देवाघरची फुलंच! त्यांचं भावविश्व वेगळं असतं. ते आपण शिक्षक व पालक म्हणून जपायला हवं!
सर्व मुलांना मी मनःपूर्वक धन्यवाद दिले व दैनंदिन कामकाजास सुरुवात झाली.
✍️श्रीकांत पाटील

