Saturday, August 17, 2024

वाडीवरची दुकानं

 वाडीवरची दुकानं


     कोकणातील वाडीवरची दुकानं म्हणजे वैशिष्ट्यपूर्णच! वाडी- वस्तीवर एखादेचं दुकान. रस्त्याच्या बाजूला कौलारू घराच्या समोर चिरेबंदी किंवा मातीच्या भिंतीची उतरत्या छपराची ही दुकानं! दुकानासमोर दोन चिऱ्यांवर आडवी केलेली एखादी लाकडी फळी. त्या फळीवर बसून दुकानदारांशी गप्पा मारत बसणारी लहान मुलं व गावकरी मंडळी हे चित्र पाहताना आजही होणारा आनंद न्याराच! 


        लांजा तालुक्यातील केळवली वरच्यावाडीत पूर्वी तीन दुकानं. विठ्ठल मंदिराजवळील पुलाजवळचं दुकान म्हणजे काशीनाथ तावडे यांचं दुकान . हे वाडीतलं पहिलंवहिलं दुकान. आता हे त्यांचाच नातेवाईक प्रकाश तावडे चालवितो . दुसरे बाकैजी मंदिराकडे जाताना लागतं ते 'म्हादांचं दुकान'. आता हे दुकान वाडीतील आत्माराम तात्या चालवत असतो. ह्या दुकांनाना बोर्डचा पत्ताच नाही. दुकानदाराच्या नावावरूनच ह्या दुकानांची ओळख. तिसरं दुकान कोटकरवाडीतल्या प्रभाकर कोटकरचं होतं. ते बऱ्याच वर्षांपूर्वी बंद झालं. 


        वाडीतल्या जि. प. च्या चार नंबर मराठी शाळेत शिक्षक असताना माझी गावच्या मंदिराकडे कधीतरी संध्याकाळी फेरी असायची. वाटेत म्हांदाचं दुकान. म्हादां दुकानात बसलेला असायचा. महादेव सुर्वे दुकानदारांचे खरे नाव. पण बारक्या पोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत महादेव दादा असं न म्हणता 'म्हांदाच" म्हणायची. सर्वांचा म्हादा! ह्या सर्व दुकानाचा माल आणण्यासाठी साखरपा हेच जवळचं ठिकाण. म्हांदा तिथूनच माल आणायचा. तालुक्याचं बाजाराचं ठिकाण जरा लांबच! बाजारातून एसटीनं दुकानात लागणारा आठवडी माल खालच्या पेठंपर्यंत आणायचा. तेथून माल डोक्यावर घेऊन तीन किमीचा दुकानापर्यंत प्रवास बहुतेकदा चालतच! आणलेला माल दुकानात प्लास्टिक वा काचेच्या बरणीत भरलेला. किराणा माल, चॉकलेट, गोळ्या, बिस्किट हे सर्व मांडून ठेवलेलं. आता रस्ता झाल्यापासून अंडी, बेकरी फूड्स , भाजीपालाच्या गाड्या गावोगावी फिरू लागले आहेत. कधीतरी चणे -शेंगदाणे घेऊन मी घरी निघताना तिथं म्हांदा बरोबर गप्पा व्हायच्या. भेटीनंतर म्हांदा हसत हसत , " हे घ्या तोंड गोड करा गुरुजी... म्हणत प्रेमाने हातात बर्फी द्यायचा. तुम्ही काय सारखं येताय व्हयं." असं म्हणायचा. 


       खरं तरं ही दुकानं म्हणजे गाव गप्पांची ठिकाणंच. घरात कंटाळलेली लहान मुलं असू द्या वा मोठी माणसं. सर्वांना दुकानाचं आकर्षण असतंच. इथं पुडी बांधण्यासाठी येणाऱ्या रद्दीतल्या वर्तमानपत्रातल्या जुन्या बातम्या कळायच्या तशाच गावातल्या बहुतेक बातम्या एकमेकांच्या गप्पांमधून समजायच्या. कोणाची गाय व्याली, कुणाचं बारसं झालं, रानात काय झालं पासून ते सध्याच्या राजकीय परिस्थितीवरसुदधा गप्पा चालतात. आजही प्रकाश तावडेच्या दुकानात चार्जिंग बल्बच्या प्रकाशात ज्येष्ठ माणसं गप्पा मारताना दिसतात. पण टिव्ही, मोबाईलमुळे तरुणाई घरीच व्यस्त. संवाद हरवत चाललेला असताना ही दुकानं म्हणजे माणसातला संवाद जपणारी ठिकाणं आहेत. ऑनलाईन खरेदीच्या युगातही यांचं महत्व विसरून चालणार नाही. 


✍️श्रीकांत पाटील



आठवणीतील झेंडावंदन

 आठवणीतील झेंडावंदन 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


         पंधरा ऑगस्ट. भारतीय स्वातंत्र्यदिन. सध्या हरघर तिरंगा अभियानामुळे प्रत्येकाच्या घरावर तिरंगा फडकत आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त सर्वत्र तिरंगा ध्वज फडकू लागला आहे. आमच्या बालपणी आम्हाला तिरंगा पहायला मिळायचा तो सरकारी कार्यालयात. गावची शाळा, तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत या ठिकाणी. मलाही तो पहिल्यांदा माझ्या जीवन शिक्षण विद्यामंदिरात पहायला मिळाला. १५ऑगस्ट आला की, शाळेत या राष्ट्रीय उत्सवाची तयारी करायला जोशात सुरुवात व्हायची. गुरुजींच्या मार्गदर्शनाने राष्ट्रगीत , ध्वजगीत, देशभक्तीपर गीतांचा सराव व्हायचे. घोषणांचा आवाज घुमायचा. सर्वत्र उत्साहाचे वातावरण . "आपली घरेदारे स्वच्छ ठेवा" ही घोषणा घरोघरी पोहचायची. पावसामुळे घराच्या दारात वाढलेले गवत काढायला , खड्डे मुजवायला सुरुवात व्हायची. जशी परिसर स्वच्छता तशी वैयक्तिक तयारीही सुरु व्हायची. गणवेश धुवून स्वच्छ करायचा. त्यावर पितळी तांब्यात विस्तव घेऊन इस्त्री व्हायची. पांढरी शुभ्र गांधी टोपी घ्यायची. हीच आमची तयारी . 


       स्वातंत्र्यदिनी गावच्या शाळेत झेंडावंदन कार्यक्रम पहिल्यांदा व्हायचा. सकाळी गावातील ज्येष्ठ मंडळी कार्यक्रमास उपस्थित रहायची. शाळेच्या मुख्य प्रवेशाच्या स्थळी काळ्या दगडांनी तयार केलेला ध्वजकट्टा. त्यावर ध्वजस्तंभ उभा. गुरुजींच्या सूचनेनुसार त्याच्या वरच्या टोकाला दोरी अडकवायला एखादा बारीक शरीरयष्टीचा मुलगा चढायचा. त्याच्यात दोर अडकवल्यावर गुरुजी ध्वज बांधायचे व वर चढवायचे. ध्वजकट्ट्याच्या बाजूला सुंदर रांगोळी पसरायची . जास्वंदीची फुलांनं आरतीचं ताट सजायचं. ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रतिष्ठीत ग्रामस्थांच्या हस्ते व्हायचा. राष्ट्रगीत, ध्वजगीत व्हायचं, भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होण्याच्या घोषणा व्हायच्या. प्रतिष्ठीत ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवायचं. सोबत अगरबत्तीचा सुगंध दरवळायचा. अन् गुरुजींच्या सूचनेनुसार गावात रांगेतून शिस्तबद्ध पद्धतीने संचलन सुरु व्हायचं. 


    संचलनात पुढे ढोल, बिगुल, झांज, ट्रँगल वाजवणारी मुले असायची. "कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाये जा" अशी देशभक्तीपर गीते गात , भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या घोषणा देत मुलं गावच्या पाण्याच्या टाकीजवळील तलाठी कार्यालयासमोर पोहचायची. राष्ट्रगीत , ध्वजगीत गायन करणारी निवडक मुलं तिथं जायची. इतर मुलं रस्त्यावरुनच तिरंग्याला सलामी द्यायची. तेथील ध्वजारोहण आटोपून फेरी पुढे निघायची. गावची चौकोनी रस्त्याची रचना असल्याने मार्ग ठरलेला असायचा. तेथून फेरी ग्रामपंचायतीजवळ पोहचायची. तिथं ध्वजारोहण कार्यक्रम सरपंचांच्या हस्ते व्हायचा. ग्रामपंचायत गोड खाऊ वाटप करायची. अन् तेथून मुलं रांगेत शाळेतील बालसभेला निघायची. 


    बालसभेत मुलांची भाषणं सुरु व्हायची. "अध्यक्ष, महाशय ,पूज्य गुरुजनवर्ग व माझ्या बालमित्रांनो आज स्वातंत्र्यदिन, यानिमित्ताने मी काही चार शब्द तुमांना सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल. अशी आशा बाळगतो व माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो." असे म्हणत बहुतेक मुलांच्या भाषणाची सुरुवात व्हायची. प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील पहिलं भाषण इथंच सुरु व्हायचं. जीवनातील हेच पहिलं व्यासपीठ. काही सभाधीटपणा नसणाऱ्या मुलांचे पाय लटपटायचे. काहीच्या अंगाची थरथर सुरु असायची. तर काही हातबांधून.. समोरच्या भिंतीवरील नजर न हटवता पाठांतर केलेलं आठवत म्हणायची. काही मुलं तर "एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो" म्हणून भाषण अर्धवट सोडून जाग्यावर निघून जायची. पण शाळेतील भाषण कलेतील हुशार मुलांचं भाषण ऐकताच सर्वांच्या टाळ्या पडायच्या. साऱ्या गुरुजींकडून व ग्रामस्थांकडून त्यांचं कौतुक व्हायचं आणि गुरुजींच्या मार्गदर्शनपर भाषणांनंतर आभार मानून कार्यक्रमाची सांगता व्हायची. 

  मुख्याध्यापक म्हणून शाळेतील ध्वजारोहण करताना आज या दिवसांची प्रकर्षाने आठवण येते. तुम्हा सर्वांना ७८व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित हार्दिक शुभेच्छा!


✍️श्रीकांत पाटील


आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...