Tuesday, January 13, 2026

नोटीशीची गोष्ट




     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या 

स्वरातील हाक ऐकून मी ही धावत बाहेर आलो. मी म्हणालो,"अहो, एवढं का घाबरलात ?झालं तरी काय?" "अहो ,दुपारी बँकवाली साहेब लोकं आली होती. मी घरी न्हवतो.त्यानी हा इंग्रजी भाषेतला कागद देवून गेलेत. आमच्या चौथीत शिकणा-या नातवानं वरचा एक शब्द तेवढा वाचला-'नोटीसं'.त्यामुळंच मी पुरा घाबरलो आहे."ते आपला घाम पुसत माझ्या हातात कागद देत म्हणाले.मी त्याना थोडं पाणी दिलं आणि नोटीसीचा काय विषय आहे हे पाहण्यासाठी कागदावर नजर फिरवली. शेजारच्या एका जवळच्या मित्राला काका एका कर्ज प्रकरणात जामीन झाले होते. मित्राने ते वेळेवर भरले न्हवते.म्हणून त्यासंबंधीतची ते नोटीसपत्र होते. "काका, तुम्ही घाबरु नका आपण तुमच्या मित्राची भेट घेऊ आणि मार्ग काढू." असे म्हणत त्याना मी धीर दिला. 

    आजकाल 'नोटीस' हा शब्द सर्वच ठिकाणी दिसतो.आमच्या सरकारी कामात तर वारंवार हा शब्द उच्चारला जातो.कधी तो कामाची माहिती देण्यासाठी तर कधी कधी काम वेळेत पूर्ण न झाले तर पुर्ततेसाठी .कधी कामाची आठवण करण्यासाठी तर कधी काम वेळीच पूर्ण करण्यासाठी . सरकारी काम वेळेत पूर्ण करणे हे लोक सेवकाना बंधनकारक असल्याने असे नोटीसीचे प्रसंग येतातच. "माझ्या नोकरीच्या आयुष्यात कधीच नोटीस आली नाही अन्ं आताचं कशी काय नोटीस आली" असे म्हणत घाबरुन जाणारी माणसं भेटतात.खरंतर दिवसेंदिवस बदलणारी नियमावली आपल्याला पाळावी लागते. निसर्गही नकळत अनेकदा माणसाला अलिखित नोटीस देत असतो. आजकाळ घडणा-या नैसर्गिक आपत्ती ही त्याचीच प्रचिती आहे.त्यामूळे निसर्गनियमांप्रमाणे आपण जगलंच पाहिजे.

     मला नोकरीच्या काळात पहिले नोटीसपत्र आले याबाबतचा एक मजेदार प्रसंग.माझ्या कार्यालयाकडूनच नोटीस रीतसर माझ्या हातात पोहचली.मी चुकीचे काही केले नसल्याचे मला माहीत होते.तरीही कार्यालयाच्या नियमानुसार त्यानी अमुक तमुक कलमाखाली आपणावर कारवाई का करु नये असा खुलासा मागितला.मी खुलासा घेऊन कार्यालयात गेलो व ज्या कारकुनाकडे ते संबंधीत काम होते त्यांच्याकडे चौकशी केली तर त्या कारकुनाने कामातील बारकाईने माझी कागदपत्र पाहिली न्हवती. आपली चूक त्यांच्या लक्षात आली व नंतर त्यानी आपला माफीनामा माझ्यासमोर सादर केला.

            आपण आपल्या गावात सार्वजनिक ठिकाणी चिकटवलेल्या अनेक नोटीस पत्र पाहतो.या जशा लेखी नोटीस असतात तशा काही तोंडी नोटीस देण्याची पध्दतही काही गावात पहायला मिळते. पूर्वी माझ्या गावात सार्वजनिक नोटीस 'आरोळी' देऊन सांगत. गावात एखादा कार्यक्रम असो अथवा पाणी, वीज, स्वच्छता बाबतची खबरदारी. एखादी सार्वजनिक ठिकाणची सभेची माहिती असो अथवा कामबंद पाळावयाचा दिवसाची (पाळक) माहिती. "उद्या मंगळवार गावात पाळक आहे हो ssss ..."अशी भारदस्त आवाजातील ती आरोळी आजही कानात घुमते.आज तीच आरोळी ग्रामपंचायतीच्या इमारतींच्या वर अडकवलेल्या ध्वनीक्षेपकातून ऐकू येते.

                माझ्या शालेय जीवनातील नोटीस आठवल्या तर आम्हास खूपच आनंद होतो. मी माध्यमिक विद्यालयात असतानाची गोष्ट. शाळेचे मुख्याध्यापक नोटीस काढत.ती नोटीस वही वाचनासाठी प्रत्येक वर्गात फिरत असे. शिपाई ती नोटीसवही फिरवत.काही वेळा परीक्षा विषयी ती नोटीस फिरत असे ,पण ब-याचअंशी ती शाळेला सार्वजनिक सुट्टी असल्याची असे.त्यामूळे शिपाई वर्गाच्या दारात नोटीस वही घेऊन आले तर आम्ही उद्या सुट्टी मिळणार या आनंदात असायचो. अशी आनंद देणारी नोटीस आयुष्यात कायम असावी असे आपल्याला वाटते.



Thursday, September 4, 2025

तस्मै श्री गुरवे नमः

 शिक्षक दिन ..विशेष लेख. 


।।तस्मै श्री गुरवे नमः।।


              गुरुवारचा दिवस. सकाळी साडेदहाची वेळ. दररोजच्या नियोजनाप्रमाणे सर्व विद्यार्थी शालेय प्रार्थना एका सुरात गात होते.


"गुरू ईश्वर तात माय

गुरुविन जगी थोर काय"


 हे प्रार्थनेतील शब्द गुरूची महीमा सांगत होते.


खरंच, " गुरूबिन ज्ञान नही" म्हणतात ते उगाचच नाही.

अगदी जन्मापासून जीवनाला दिशा देणारे गुरूच.


आयुष्यभरात अनेक गुरु लाभत असतात. जन्मतःच आई गुरु म्हणून लाभते. वडील ही पाठीशी खंबीरपणे उभे राहून जीवनदिशा दर्शवित राहतात. शैक्षणिक जीवनात निरंतर ज्ञान देणारे शिक्षकवृंद. 'गुरु' या शब्दातील ‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणे.’ गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे, ते आपल्याला शिकवतात.जन्मापासून आपण आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींपासून, माणसांपासून काही ना काही तरी शिकत असतो आणि म्हणूनच तर आपण जगण्यायोग्य बनत जातो. प्रत्येक गोष्ट जी आपल्याला शिकवण देते ती गुरुच असते. उदाहरणार्थ सूर्य, पृथ्वी, वारा, अग्नी, जल, नद्या, झाडे, फुले, पाने, ढग, डोंगर निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला काही तरी बोध देत असते. या सर्वांना आपण गुरुस्थानी मानून त्या प्रत्येक पदार्थाविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. त्यांची देण्याची, त्यागाची, परोपकारी वृत्ती आपल्यात आली पाहिजेआणि या गोष्टी शिकवण्यासाठी आपल्याला योग्य गुरूची आवश्यकता असते.


    प्रत्येकाच्या विचार सरणी प्रमाणे प्रत्येकाचे गुरु विषयी मत सुद्धा वेगळेच.विखुरलेल्या जीवनात जर अचानक कुणी आपली मानसिकता समजून, योग्य दिशा दाखवणारा भेटला तर तो आपल्याला गुरु समान असतो. असे आपले अनेक गुरु असतात की त्यांना ही माहीत नसते त्यांना आपण गुरु मानतो.


    आजच्या धावत्या जगात प्रत्येकाच्या जीवनात फक्त प्रश्नचिन्ह उमटलेली दिसतात.या प्रश्नचिन्हाच्या जाळयातून बाहेर काढणाराच खरा गुरू ठरतो. समजून घेणारे शिक्षक विद्यार्थ्यामध्ये लोकप्रिय असतात.त्या शिक्षकांना आदरही मिळू शकतो.मात्र हा आदर मिळवणं मोठं आवघड काम आहे.हा आदर मिळवण्यात यशस्वी होणाराच खरा गुरू होऊ शकतो. शिक्षक मार्गदर्शन करत असताना शिष्याला समजून घेण्याची पद्धत वा मार्ग वेगळा असू शकतो तो मार्ग गुरुने जाणला पाहिजे.


       आजकाल पूर्वीची गुरूकुल पध्दतच खूप चांगली आणि आदर्श होती असे वाटते.मुलांना ऋषीमुनींकडे अरण्यात पाठवत. मग ते गुरू त्यांना स्वावलंबनापासून तर सर्व प्रकारच्या कलागुणांमधे पारंगत करीत असत. त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार करीत असत. स्वत:च्या आचरणाने त्यांच्यात चांगले गुण परोपकार, त्याग, शोर्य, इतरांशी वागण्याची पध्दत, मोठ्यांविषयी आदर, सर्वांसाठी प्रेमाची भावना इत्यादी रुजवत असत. पालक देखील त्या गुरूंच्या ताब्यात आश्रमात सोडून निघून जात आणि त्या शिष्याला शिक्षा करण्याची मुभा गुरूला असे.आता तर शिक्षक शिक्षाही करू शकत नाही. 'छडी लागे छम छम, विद्या येई घम घम 'हे गाण्यातील शब्द आता मागे पडलेत. आज मुलेही फारच संवेदनशील मनाची झाली आहेत. त्यांचं मन जपणं हे फारच कौशल्याचे आहे.


     आपल्याला प्राचीन इतिहासात पाहायला मिळते,उत्कृष्ट धनुर्धारी एकलव्य गुरुविना दिशाहीन होता,गुरु नसला तरि त्याने मातीत गुरु शोधला.गुरु द्रोणाचार्यांचे अर्जुनाप्रती असलेले प्रेम हे गुरु च्या शिष्य प्रेमाचे मोठे उदाहरण आहे,एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून दिलेला अंगठा हे गुरुप्रती गुरुभक्तिचे उदाहरण पहावयास मिळते.गुरुमुळे जीवनाला स्थिरता येते.


        मी सुद्धा एक शिक्षक आहे,ज्ञानदान हे शिक्षकाचे आद्य कर्तव्य असले तरी देशासाठी देशभक्त तयार करण्याचे कार्य खरे शिक्षक करीत असतात.आपल्याला एक चांगला नागरिक बनविण्यात जे जे शिक्षक वाटेत भेटत गेले त्या सर्वांप्रती आज शिक्षक दिना निमित्त कृतज्ञता प्रत्येकाने व्यक्त करायलाच हवी. त्याना माझे सदैव नमन !  


गुरवे नमः। गुरवे नमः । गुरवे नमः॥


शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


- श्रीकांत पाटील 

skplanj@gmail.com 


 #thankyouteachers

पत्रं

 ✉️📧💌 ललितबंध✉️📧💌


*पत्रं*

✍️ श्रीकांत पाटील 



    दुपारचं जेवण आटोपलं. जरा विश्रांतीसाठी चटईवर पाठ टेकवली. मोबाईलवर आकाशवाणीच्या विविधभारती केंद्रावरील गाणी चालू होती. गायक महंमद रफिंच्या आवाजात "कन्यादान 'चित्रपटातील गीताचे बोल कानावर पडत होते.


        " लिखे जो खत तुझे , 

          वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए."


    या श्रवणीय गीतातील पत्राच्या आशयावरुन मला एक दशकापूर्वीच्या दिवसात नेले . त्यावेळी मी नोकरीच्या गावी होतो. दुपारी पोस्टमन दारात येत असायचा. एका हाताने कपाळावरचा घाम पुसत, दुस-या हातात पत्रं व काखेला खाकी टपालाची पिशवी अडकवलेली घेऊन "गुरूजी, हे घ्या टपाल " म्हणत पडवीतल्या चोपाळ्यावर बसायचा. थोडीफार विचारपूस व्हायची. थंडगार मडक्यातलं पाणी पिऊन वाडीतील कुणाची पत्रं तर कुणाची चाकरमान्यांनी केलेली मनिऑर्डर द्यायला निघायचा. महिन्यातून दोन चार पत्रं हमखास असायची.


      माझ्या बालपणी माझं व पत्राचं घनिष्ट नातं होतं. गल्लीतच देवळाजवळ पोस्टऑफिस होतं. सकाळी सकाळी ऑफीसात कागदपत्रावर पोस्टाचा शिक्का मारताना घरात आवाज ऐकू यायचा. मी पोस्टात पळत सुटायचो. दोन -तीन मुलं पोस्टात घुटमळत असायची.आम्हाला बघून पोस्टमनकाका म्हणायचे, "अरे बाळानो,ही किल्ली घ्या व पेटीत काय पत्रं असतील तर ती घेऊन या." पोस्टाची ती लाल पेटी तिथे जवळच्याच घराजवळ अडकवलेली होती. आम्ही कट्ट्यावर चढून पेटीचं कुलूप उघडून पत्रं हातात घ्यायचो. पेटी हलवून अजून कांही पत्रं अडकली तर नाहीत ना? याची खात्री करायचो. त्यात बहुतेकदा पोस्टकार्ड, आंतर्देशीय पत्रं असायची. जमवलेली पत्रं पोस्टमनकाकाकडे देत असे.पोस्टात नेहमी डिंक लागायचा. कधी कधी आमच्या जवळ डिंक कोणाकडे आहे काय? म्हणत चौकशी करायचे. आम्ही शेरडाबरोबर जाऊन बाभळीचा डिंक गोळा करत असे. तो डिंक बाटलीत भरुन आणून देत असे. त्याबदल्यात खाऊसाठी आम्हाला पैसे द्यायचे. आम्हालाही आनंद व्हायचा.

     

        पत्रलेखन ही एक कला आहे. पत्र लेखन हा एक साहित्यप्रकार आहे. माझ्या लेखनाची सुरुवात ख-या अर्थाने पत्रलेखनाने झाली. माझे अक्षर सुंदर होते. त्यामूळे बहुतेकदा मला लेखनिक म्हणून गल्लीत मागणी असायची. प्राथमिक शाळेत पत्रलेखनाची ओळख झाली होतीच. त्यामुळे कोणासाठी कोणता मायना वापरायचा याचे पक्के ज्ञान होते. मजकूर ज्याचा- त्याचा विषय असायचा. बहुतेकदा मुंबईत असणा-या त्या नोकरदार मंडळीना पत्र लिहायचो. मुंबईहून आलेली पत्रं वाचून उत्तर द्यायला सुरवात व्हायची. मजकूराची सुरुवात ब-याचदा "तुझे पत्र मिळाले. वाचून आनंद झाला. (आठवणीचे दुःख असले तरीही)अशीच असायची.

 त्या काळात बी .डी . डी . चाळ, ना.म.जोशी मार्ग ,मुंबई या पत्त्यावर बरीचशी पत्रं असायची. याच चाळीत गाववाल्यांची खोली. मुंबईत गेल्यावर बहुतेकजणांची सुरुवात त्याच खोलीत व्हायची. गावाकडची खबर पत्रातून मांडायचो. ती लिहिलेली पत्रे त्या काळातील सामाजिक व वैयक्तिक भावविश्वाचे दर्शन घडवत होती. घरातील मुलं बाळ,म्हातारी माणसं, पाहुणेमंडळी ,अगदी गुरं ढ़ोरं यांचे सुद्धा बरं -वाईट पत्रातून लिहलं जायचं. पैसा- अडका, शेतातली पिकं , पाऊसपाणी सर्व काही त्यात उतरायचं. आपल्या भावना व विचाराना पत्रातून मोकळं केलं जायचं. शब्दां शब्दांचे भाव सोबत असायचे. पत्राच्या शेवटी "लिहताना चूक झाली असल्यास क्षमा असावी" ही मी विशेष नोंद नेहमी करायचो. गावी आल्यावर या मुंबईकर मंडळीकडून मला शाबासकीची थाप मिठाई सह जरुर मिळायची.


      आजच्या या दिवसांत दूरसंचारक्रांतीमुळे वॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा , ट्वीटर या सोशल मेडियाचा वापर जास्त सुरु झाला. अंतर कमी झाले. संदेश क्षणार्धात पोहचू लागले. तरीही पत्राचे महत्व कमी झाले नाही. सरकारी व व्यावसायिक पत्रं चालूच असतात ,पण हरवली ती कौटुंबिक पत्र. ज्यामध्ये प्रेम, भय, आदर ओथंबून वाहत असायचा. पत्र डोळ्यासमोर घेताच पत्रातून चेहरे दिसायचे.हव्या तितक्यावेळा अक्षरे डोळ्यासमोर पुन्हापुन्हा घेता यायची.अनौपचारिक पत्रांचा मायना, मजकूर आज फक्त शालेय अभ्यासक्रमपुरता. पाच-सहा मार्कांशी संबंधीत. खरं तर पत्रलेखनामुळे भाषिक विकास होतो. स्वतःला व्यक्त होण्याचा व परस्पर संवादाचे ते माध्यम आहे. सध्या सोशल मिडीया वापर करुन अफवांचा धुमाकूळ चालू आहे. विश्वासार्हता लोप पावत चालली आहे. सानेगुरुजी, पंडीत नेहरु यानी लिहिलेली पत्रे उत्तम साहित्य म्हणून वाचकांसमोर आली. अगदी अलिकडची अरविंद जगताप यांची पत्रे वाचकांच्या मनात जागा करतात. म्हणून शेवटी 'खुद्दार ' चित्रपटातील , सोनू निगमजींच्या आवाजातील गीताचे शब्द अलगद ओठावर येतात.

  "खत लिखना हमें खत लिखना

   खत लिखना बाबा ,खत लिखना

       दिल से हो जाओ मजबूर,  

        तो हमको खत लिखना"

Sunday, December 29, 2024

गुरुजींचं स्वागत

 गुरुजींचं स्वागत🎉🌷🌹


      २०२४ सालचा शेवटचा आठवडा. नव्या वर्षाची चाहूल सर्वांना लागली आहेच! माझ्या मराठी विद्यामंदिर मौजे जट्टेवाडी, (ता.चंदगड, जि. कोल्हापूर) शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनाही हा शेवटचा आठवडा उत्सुकतेचा होता, कारण याच आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना चाहूल लागली होती शाळेत नवे गुरुजी येण्याची! आणि शेवटी तो पवित्र दिवस उजाडला. २४ डिसेंबर. सव्वाशे वर्षापूर्वी याच दिवशी आपल्या महाराष्ट्रात सानेगुरुजींचा जन्म झाला . अशा मंगल दिवशी नव्या शाळेत रुजू होणं व मुलांना गुरुजी मिळणं हे दोघांचंही भाग्यंच!


       पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक , ग्रामस्थ, शिक्षकमित्रपरिवार यांनी माझं स्वागत केलंच .पण मुलांना उत्सुकता होती नवे गुरुजी कोणत्या वर्गानां शिकवणार? म्हणजेच ते कोणाचे वर्गशिक्षक होणारं? दुसऱ्या दिवशी नाताळची सुट्टी होती तसेच आठवडाभरात वार्षिक शाळातपासणीही तोंडावर आलेली. त्यामुळं वर्गनियोजन करणं आवश्यक होतं. त्याच दिवशी सायंकाळच्या सत्रात आम्ही वर्गनियोजन पारं पडलं. मुख्याध्यापिका सुतार मॅडमनी मला सहविचारने इ. तिसरी व चौथीचा वर्ग दिला. शाळा सुटली . पण मुलांना त्यांना कोण वर्गशिक्षक मिळणार याची त्यादिवशी कल्पना नव्हती.


              नाताळच्या सुट्टीनंतर २६ डिसेंबरला मुले शाळेत आली . ठरल्या वेळेप्रमाणे परिपाठ झाला. एका वर्गखोलीत पहिली -दुसरीचे वर्ग बसायचे व दुसऱ्या वर्गखोलीत तिसरी -चौथीचे. दोन्हीही वर्गखोल्या स्वतंत्र इमारतीत. मी हजर होण्यापूर्वी महिनाभरासाठी याच वर्गावर एक शिक्षिका होत्या. त्याही पाटील बाईच! पण आज मुलांना कायमस्वरुपी गुरुजी मिळणार होते अन् तेही पाटील गुरुजीच! त्यामुळे सर्वच खूश.


      मी वर्गावर जाण्यास निघालो. वर्गाचा दरवाजा काही अंशीच उघडलेला. आत प्रवेश करताना दरवाजाच्या आडोशाला कोणीतरी विद्यार्थी ऊभे असल्याचे मला दिसले. मला वाटले वर्गाच्या कोपऱ्यातील कचराटोपलीत कागदाचे कपटे टाकण्यास कोणीतरी उभा असेल. मी वर्गाचा उंबरठा ओलांडला. आत पाय टाकताच सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात " वेलकम सर ! " म्हणत माझ्या अंगावर गुलाब पाकळ्यांची वृष्टी केली. आनंदाने नाचत टाळ्या वाजवल्या. मी केवळ त्या गुलाबांच्या पाकळ्यात न्हाऊन गेलो नाही तर त्या विद्यार्थ्यांच्या प्रेमाने न्हाऊन निघालो. असं स्वागत मी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो. मला सर्व मुलांनी खुर्चीजवळ नेलं. टेबलावर कांही पांढरे व कांही लाल गुलाब होते . ते माझ्या हातात देत माझं स्वागत व अभिनंदन केलं. मी मुलांच्या प्रेममय स्वागताने भारावून गेलो.


      मी मुलांना विचारलं, "मुलांनो , माझं अशाप्रकारे स्वागत करायला तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला हे कसं सूचलं? कोणी पालक वा शिक्षकांने सांगितलं की काय?"

मुले म्हणाली, " असं काहीच नाही. हे वर्गातील सर्वांनीच अगोदर ठरवलं होतं. पायल, स्वरा, आरुशी यांनी फुलं आणली, कांही फुलांच्या पाकळ्या काढल्या व आम्ही तुमचं स्वागत केलं. खरंच, मुलं म्हणजे देवाघरची फुलंच! त्यांचं भावविश्व वेगळं असतं. ते आपण शिक्षक व पालक म्हणून जपायला हवं!


 सर्व मुलांना मी मनःपूर्वक धन्यवाद दिले व दैनंदिन कामकाजास सुरुवात झाली.


✍️श्रीकांत पाटील



शाळेचा पहिला दिवस

 शाळेचा पहिला दिवस



       वाचक मित्रहो लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला शाळेतले दिवस आठवले असतील. हायस्कूलमध्ये असताना मराठीच्या पेपरमध्ये निबंध लेखनासाठी असणारा हा विषय. प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचा पहिला दिवस अगदी आठवणीतला. विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून तुम्ही तो परीक्षेतील गुणांसाठी कागदावर मांडलाही असेल वा संवादातून सांगितलाही असेल. पण आज मी शिक्षकाच्या भूमिकेतून लिखाणास घेतला आहे. होय..... शिक्षक म्हणून माझा 'शाळेचा पहिला दिवस'


      खरं तर नोकरी म्हणून 'नोकरीचा पहिला दिवस' हा विषय यापूर्वी मी एका  लेखातून  मांडला आहेच. पण रत्नागिरीतील सुमारे तेवीस वर्षे नोकरीचा कालावधी संपवून मी यंदा तेवीस सप्टेंबरला जिल्हा परिषद कोल्हापूर येथे हजर झालो. शासन निर्णयानुसार आठवडाभरात एखाद्या शाळेवर हजर होईन असे वाटले होते. पण तब्बल तीन महिने झाल्यावर हे वर्ष संपता संपता तेवीस डिसेंबर हा दिवस उजाडला आणि जिल्हा परिषद कोल्हापूर येथे समूपदेशनाने मला जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील तालुका चंदगड मिळाला. या तालुक्यातील शाळा होती "मराठी विद्यामंदिर मौजे जट्टेवाडी".  


       २४ डिसेंबर २०२४. शाळेत हजर होण्यासाठीचा दिवस. गडहिंग्लज बसस्थानकाहून सकाळीच चंदगड बसमधून प्रवास सुरु झाला. गुगलवरुन गावचे लोकेशन शोधले होतेच. पण तिथे जाण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिकाकडून माहिती घेतली. नागणवाडी स्टॉपला उतरून तिथून तालुक्यातून बेळगाव जाणार्‍या कोणत्याही बसने गुडेवाडी फाट्यावर यायचे. तिथून साधारण दोन किलोमीटरवर शाळा असल्याची त्यांनी माहिती दिली. कोकणातील शाळेत जाण्यासाठी चार-पाच किमीची सुरुवातीच्या वर्षांची पायपीट अनुभवाला होतीच. त्यामुळे दोन किमी सहज चालत जाऊ असा मनात विचार केला. प्रवास सुरु असतानाच माझ्या कांही शिक्षक मित्रांनी मला शाळेवर नेण्यासाठी तेथील शिक्षकांना फोनाफोनी केली होती. दरम्यान त्यांचे फोन प्रवासात मला आले. त्यापैकी एक काॅल होता दाटे केंद्रमुख्याध्यापकांचा. ते म्हणाले, " मी नागनवाडीत येतो .तुम्ही तिथेच थांबा." कांही वेळेनंतर बस नागणवाडी गावात आली. शालेय विद्यार्थी व प्रवासी उतरू लागले. मीही बसमधून उतरलो. बस चंदगडकडे निघून गेली. सरांची वाट पाहत मी सांवतवाडी-बेळगाव रस्त्यावरील जाणारी वाहने पाहत स्टाॅपवरील उंबराच्या झाडाखाली बसलो. 


 इतक्यात एक कारगाडी माझ्याजवळ थांबली. माझी पाठीवर घेतलेली सॅक व पेहराव पाहून चालकांकडून मला विचारणा झाली. 

" तुम्ही पाटील सर ना?" 

मी त्यांना नमस्कार करत "होय "म्हणालो.  

" मी गावडे सर , तुमचे चंदगड तालुक्यात हार्दिक स्वागत!" असे म्हणत त्यांनी माझ्या हातात हात देत गाडीत बसायला सांगितले आणि गाडी शाळेकडे जाण्यास मार्गस्थ झाली. प्रवास दरम्यान सरांनी आपली ओळख सांगितली. गावडे सरांबरोबर केंद्राविषयी संवाद झाला. आज शाळा तपासणीची सुट्टी असल्यानेच तुम्हाला वेळ देता येत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी गाडी गुडेवाडी फाट्यातून आत वळवली . गावच्या लालमातीचा गंध येत होता. गावच्या गल्लीतून जाताना लोकांचे चंदगडी बोलीतील शब्द कानावर पडत होते. बोलीतील शब्दांचे सूर कानाला सुखावून सोडत होते. कोणतीही बोली ही हृदयाची भाषा असते. तिला प्रमाणबद्धतेची चौकट नसते. म्हणून ती ओसंडून वाहते. आपल्या मराठी भाषेचे अशा बोलींमुळेच अभिजातपण दिसून येते.  


        सरांनी एका शाळेजवळ गाडी थांबवली. शाळेच्या षटकोणी आकाराच्या इमारतीचे रंगकाम चालू होते. जुन्या कौलारू इमारतीत मुले बसली होती. आम्हाला पाहून शाळेतील एक तरुण शिक्षक आमच्या गाडीजवळ आले. गावडे सरांनी मला त्यांची ओळख करुन दिली."हे नामदेव पाटील सर. शिक्षणसेवक पदी चारमहिन्यापूर्वी हजर झालेत." मला चेहरा ओळखीचा वाटला. पाटील सरांनी त्यांच्या नाधवडे(ता. भुदरगड)गावात पूर्वी आपली भेट झाल्याची आठवण करून दिली. दरम्यान ही शाळा पाहून आपण मजरे जट्टेवाडीत आल्याचे गावडे सरांना समजले. मजरे व मौजे यामुळे नेमका गोंधळ झाल्याचे म्हणाले. मला माझ्या सासरवाडीतील खुर्द व बुद्रुक यामध्ये अजूनही गोंधळ होत असल्याचे गमतीची आठवण गावडे सरांनी सांगितली व सर्वांना हसू फुटले. पाटील सर म्हणाले, "आता चुकून आलातच तर शाळेत या." आम्हाला शालेय प्रांगणात बोलावले. मुलांच्या टाळ्या घेत आमचे शाब्दिक स्वागत झाले व आम्ही मौजे जट्टेवाडीकडे निघालो. वाटेत कमान दिसली. कमानीवरच्या गावच्या नावाच्या अक्षरांचे रंग उडून गेले होते. त्यामुळेच गाडी मजरे जट्टेवाडीत पोहचली होती. हे लक्षात आले.


     आता गाडी कमानीतून मौजे जट्टेवाडी गावच्या वेशीत पोहचली. आजूबाजूला नुकताच ऊस कारखान्यास गेल्याने शेतातील खोडव्यांला पालवी फुटली होती. रस्त्याच्या एका बाजूला अजूनही तोड न आलेला त्या तांबड्या मातीतील ऊसाच्या तुर्‍यांनी माझे स्वागत केले. वाडीतील गल्लीतून गाडी शाळेजवळ पोहचली. एका टुमदार छोट्याशा कमानीवर शाळेचं नाव दिसलं. "मराठी विद्यामंदिर मौजे जट्टेवाडी". दोन वेगवेगळ्या नवीन वर्गखोल्या दिसल्या. कमानीतून प्रवेश करताना ज्ञानमंदिराला नमस्कार केला. अन् 'शाळेचा पहिला दिवस' सुरु झाला.

 

       शाळेच्या मुख्याध्यापिका सुतार मॅडम व मुलांनी आमचे स्वागत केले. शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ हातात देत स्वागत झाले. दरम्यान मी आजचा दिवस खास असल्याचे सांगत पिशवीतील गोष्टींची पुस्तके काढली. आज सानेगुरुजी यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती. त्यांना अभिवादन मुलांना पुस्तकभेट देऊन केले. या पवित्र दिवशी माझे माझ्या जिल्ह्यात ज्ञानदानाचे काम सुरु होत आहे . हे भाग्य असल्याचे सांगितले. दरम्यान दिवसभरात पालकवर्ग, तालुक्यातील कांही शिक्षकमित्र येऊन स्वागत करत होते. मुले पुस्तके न्याहाळण्यात दंग होती. आपल्या डाॅ.ए.पी.जे.अब्दुलकलाम फिरता वाचनकट्ट्यामार्फत मुख्याध्यापिका मॅडमना 'श्यामची आई' पुस्तक भेट दिले व पुष्पगुच्छ नको, पुस्तक द्यावे असे सर्वांना आवाहन केले. 


दुसऱ्या दिवशी नाताळची सुट्टी असल्याचे मुलांना सांगितले. कांही मुलांच्या हातात पुष्पगुच्छातील फुले दिली. शाळा सुटल्यानंतर मला बसथांब्यावर नेण्यासाठी आम्हा शिक्षकांच्या समुपदेशन प्रक्रियेसाठी धडपडणारे शिक्षकमित्र शाहू पाटील सर आले. त्यांनी माझे स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस आनंद मनात ठेवून अस्ताकडे जावू लागला अन् मीही गावी जाण्यासाठी मार्गस्थ झालो.


✍️श्रीकांत पाटील


Saturday, September 7, 2024

तीन शाळांतील तेवीस वर्षे

 तीन शाळांतील तेवीस वर्षे 


(येत्या सोमवारी23 सप्टेंबरला रत्नागिरी जिल्ह्यातून कार्यमुक्त होऊन कोल्हापूर जिल्ह्यात बदलीने हजर होत आहे. त्यानिमित्ताने रत्नागिरीतील माझ्या एकूण कारकीर्दीवर टाकलेला दृष्टीक्षेप.)


           प्रत्येक सरकारी नोकरदाराच्या आयुष्यात बदली हा शब्द ठरलेलाच! सरकारी नोकरीतील आयुष्य म्हणजे विंचवांचं बिऱ्हाडच! बदली झाली की संसाराचं बोचकं बांधून जाणं ठरलेलंच! कधी बदली ही प्रशासनाच्या सोयीसाठी होते तर कधी आपल्या विनंतीने. मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे आलेच! बदली होते तेव्हा आपण फक्त ते ठिकाण सोडत नाही तर माणूस म्हणून जोडलेल्या माणसांच्या सहवासापासून दूर जातो. मग होणारा विरह सहन करण्याची मनाला तयारी करावीच लागते. 


     माझ्या नोकरीत आजपर्यंतच्या तेवीस वर्षांत तीन शाळा झाल्या. यामध्ये केवळ दोनवेळाच बदली झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा मोसम.नं.१.ही माझी पहिली शाळा. या शाळेत २१डिसेंबर २००१रोजी मी शिक्षणसेवक पदी हजर झालो. या शाळेतून पहिली बदली साडेतीन वर्षे सेवा झाल्यावर जुलै२००५ मध्ये लांजा तालुक्यातील सालपे नं ४ शाळेत झाली. दुसऱ्यांदा बदली झाली ऑगस्ट २०१४ मध्ये पदोन्नतीने सालपे गावातीलच एक नंबर शाळेत. या बदलींने मनाला काहीच वाटलं नव्हतं. कारण तो कोकण परिसर सोडावा लागला नाही. पण नुकतीच माझी आंतरजिल्हा बदली झाली अन् झालेली बदली स्वीकारताना अंतःकरण जड झाले. या दोन दशकात केवळ शाळेशी एकरुप न राहता इथल्या समाजाशी, निसर्गाशी कधी एकरूप झालो हे कळलेच नाही! आता माझ्या जिल्ह्यात येताना जवळ जवळ गेल्या तेवीस वर्षातील ते दिवस आठवतात. अन् ओठी एकच वाक्य येते..."गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी.!"


          नोकरीची सुरुवात माझ्या वयाच्या एकविसाव्या वर्षी झाली. तेव्हा शिक्षक नोकरी मिळाल्याचा आनंद वेगळाच होता. मेरीटनुसार कंत्राटी पद्धतीने भरती झालेली. तीन वर्षे मासिक तीन हजार मानधन ठरलेले! पण ...तेव्हा ते मानधनही आम्हांस पुरेसे होते! मोसम गावात असताना गावातील सरवणकरवाडीतच बहुतेक काळ राहिलो. त्यावेळचा जसा पगार तशा गरजाही मर्यादित! तिथे मुलांच्यात रमलो. माळावरच्या त्या ज्ञानमंदिरात शिकवता शिकवता माझेही पुढील शिक्षण चालू ठेवले. शिक्षक म्हणून समाजात मिसळलो. आजही समाजमाध्यमाद्वारे तेथील बरेच विद्यार्थी संपर्कात असतात याचा मनस्वी आनंद वाटतो. 


        माझी पहिली बदली मोसम शाळेतून झाली तीही एका शिक्षकमित्रासाठी. केरकर गुरुजी हे माझ्याच केळवली केंद्रातील. नुकतेच त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या पत्नी लांजा तालुक्यातील शिरवली येथे शिक्षिका होत्या. त्यांना बदलीने केंद्रात आणायचं होतं. त्यांच्या पत्नीसाठी सोयीची शाळा म्हणजे माझी शाळा. पण शाळेत एकही रिक्त पद नव्हते. त्यांनी माझे सहकारी चव्हाण गुरुजींना कबुलीजबाब बदलीसाठी विचारले. पण ते शिक्षणसेवक असल्याने त्यांची बदली अशक्य!. मी त्यांचे बोलणे ऐकले. त्यांना बदलीसाठी कबुली दिली. लांजा तालुक्यातील शिरवली गावी त्यांनी बदलीपूर्वी शाळा दाखवली. राहण्याची सोय केली. मी तिथे रहायलाही गेलो. पण लांजा पंचायत समितीतून आदेश मिळाला नव्हता. आदेश आणण्यास कार्यालयात गेलो अन् तिथे पवार आडनावाचे शिक्षक भेटले. त्यांना शिरवली शाळा पाहिजे होती. ते त्यासाठी साहेबांच्या भेटी घेत होते. जवळपासच्या शाळेतही रिक्त पद नव्हते. अखेर त्यानी मला विनंती केली. मीही त्यांना संमतीपत्र दिलं व त्यांची सोय केली. माझे एकच मागणे होते "शाळेच्या जवळ राहता येईल अशी शाळा द्या." कारण मी त्यावेळी स्पर्धापरीक्षेचा अभ्यास चालू केला होता. आणि माझा शाळेला येण्या-जाण्यात वेळ जाऊ नये हा एक उद्देश होता. तत्कालीन सभापती श्री. दत्ताजी कदम साहेबांना विनंती केली व त्यांनी त्यांच्या सालपे गावातील चार नंबर शाळेचा आदेश दिला व हजर झालो. 


        केळवली वरच्यावाडीत असलेली पूर्ण प्राथमिक शाळा सालपे नं.४. तीन शिक्षकी शाळा. दोन शिक्षक हजर व एक रिक्त. बंडगर गुरुजी मुख्याध्यापक व दुसरे मोरे गुरुजी. मोरे गुरुजी माझी चातकाप्रमाणे वाट पाहत होते. मी हजर होताच जिल्हाबदलीने ते कार्यमुक्त होणार होते ना!. तसं त्यांच्या बदलीआदेशावरही नमूद केलं भमहोते. मी हजर होताच ते कार्यमुक्त झाले. दुसऱ्या दिवशी प्रशासकीय बदलीने गावातील दोन नंबर शाळेतून मुख्याध्यापकांच्या पत्नी बंडगर बाईही हजर झाल्या. २३जुलै २००५पासून सुरु झालेला या शाळेतील प्रवास प्रगतीशील होता. 


        शाळेजवळच बँकवाले कोटकर यांच्या घरी राहण्याची सोय झाली. घरमालक बॅंकेत काम करायचे म्हणून तशी ओळख . राहण्याचे ठिकाण शाळेजवळच शंभर पावलावर असल्याने शाळेतच मुलांसोबत अधिक वेळ जायचा. विविध खेळ, स्पर्धापरीक्षेचे ज्यादा तास, सांस्कृतिक कार्यक्रम , सामाजिक उपक्रमात मी रममाण झालो. तीन- चार वर्षात जवळच असणाऱ्या चिंचुर्टी धावडेवाडीत जाणारा रस्ता तयार झाला. वाडीतील मुलं चौथीनंतर माझ्या शाळेत येऊ लागली. चाळीशीतला पट साठावर पोहोचला. शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्णांचे प्रमाण वाढले. जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत ग्रामीण भागातील मुलींनी कबड्डीत सुयश प्राप्त केलं. शाळेची प्रगतीपाहून माघी गणेशोत्सव मंडळ, युवक मंडळ, वाडीतील सामाजिक मंडळांनी , दानशूर व्यक्तींनी देणगी दिली. संगणक, बेंचसुविधा, शैक्षणिक साहित्य यासाठी भरभरून सहकार्य लाभले. 


      दरम्यान २०१० सालात तीनावरची शिक्षक संख्या चारावर पोहचली. गणेश घुले हे नगरहून शिक्षणसेवकपदी हजर झाले. त्यांचंही नव्या उमेदीनं काम सुरु झाले. मुख्याध्यापकांची बदली झाली. अनंत शितोळे २०११च्या जूनमध्ये शिक्षणसेवकपदी हजर झाले. शाळेत विषयवारी सुरु झाली.२०१४ला शाळेचा सुवर्णमहोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. दरम्यान पदोन्नतीने मी ३० ऑगस्ट२०१४ रोजी याच सालपे गावातील एक नंबर शाळेत विषयशिक्षक पदावर रुजू झालो. गेली दहा वर्षे सालपे येथे गेलो तरी सालपे -केळवली गाव म्हणून एकत्र अनेक शैक्षणिक उपक्रम सुरु केले. डाॅ.ए.पी.जे.अब्दुलकलाम फिरता वाचनकट्टा ही याच केळवलीतून सुरु झालेला अभिनव उपक्रम.

       

        सालपे नं. १ शाळेचे सन २०१४-१५ हे अमृतमहोत्सवी वर्ष. याच शाळेत अमृतमहोत्सवानिमित्त डिजीटल स्कूल, मिशन स्कॉलरशीप सुरु केले. या वर्षी सातवीतील ओंकार घाग हा विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकला. हर्षे गुरुजी मुख्याध्यापक होते. विषयशिक्षक दुंडाप्पा चौगुले, तसेच संजय सुतार, उमेश कुबडे ह्या सहकारी शिक्षकांचे या ठिकाणी उत्तम सहकार्य लाभले . हर्षे गुरुजी सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार १जानेवारी २०१९ पासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत झालो. ग्रामस्थ, पालक यांच्या उत्तम सहकार्यातून वाचनचळवळ रुजवत गेलो . कोरोना काळात मुलांची पुस्तके हिच सोबती झाली. मुलेच पुस्तकदूत झाली. अबालवृद्धांपर्यंत चळवळ पोहचवली आणि पुढे ही चळवळ वृद्धिंगत झाली. एबीपी माझा , लोकसत्ता, दै. सकाळ, लोकमत, रत्नागिरी टाईम्स अशा माध्यमांनीही नोंद घेतली. यंदाच्या तालुकास्तरीय महावाचन उत्सवात खास बोलावणे आले हे या उपक्रमाचे महत्व अधोरेखित करते. हा उपक्रम सदोदित चालू राहणार आहे. जिथं बदलीने जाईन तिथं पुस्तकांची सोबत नक्कीच राहील. 


         येत्या सोमवारी 23 सप्टेंबर 2024रोजी कार्यमुक्त होऊन मी कोल्हापूर जिल्ह्यातील सेवेसाठी जाईन. पण ही नोकरीच्या निमित्ताने गेल्या तेवीस वर्षांत जुळलेली माणूसकीची नाती कधीच तुटणार नाहीत. ती आभासी नाहीत. ती वास्तव आहेत. गावात शिक्षक म्हणून काम करताना प्रत्येक ग्रामस्थांकडून खूप प्रेम मिळाले. जीवाभावाचं नातं जुळलं. समाजाच्या सुखदुःखात सहभागी होता आलं. या बदलीच्या निमित्ताने कोकणातून दूर जात असलो तरी विद्यार्थ्यांसाठी भेटणे राहीलच! सर्व रत्नागिरीकरांचे असेच शुभाशीर्वाद राहोत हिच मनोकामना!


        -श्रीकांत पाटील

Saturday, August 17, 2024

वाडीवरची दुकानं

 वाडीवरची दुकानं


     कोकणातील वाडीवरची दुकानं म्हणजे वैशिष्ट्यपूर्णच! वाडी- वस्तीवर एखादेचं दुकान. रस्त्याच्या बाजूला कौलारू घराच्या समोर चिरेबंदी किंवा मातीच्या भिंतीची उतरत्या छपराची ही दुकानं! दुकानासमोर दोन चिऱ्यांवर आडवी केलेली एखादी लाकडी फळी. त्या फळीवर बसून दुकानदारांशी गप्पा मारत बसणारी लहान मुलं व गावकरी मंडळी हे चित्र पाहताना आजही होणारा आनंद न्याराच! 


        लांजा तालुक्यातील केळवली वरच्यावाडीत पूर्वी तीन दुकानं. विठ्ठल मंदिराजवळील पुलाजवळचं दुकान म्हणजे काशीनाथ तावडे यांचं दुकान . हे वाडीतलं पहिलंवहिलं दुकान. आता हे त्यांचाच नातेवाईक प्रकाश तावडे चालवितो . दुसरे बाकैजी मंदिराकडे जाताना लागतं ते 'म्हादांचं दुकान'. आता हे दुकान वाडीतील आत्माराम तात्या चालवत असतो. ह्या दुकांनाना बोर्डचा पत्ताच नाही. दुकानदाराच्या नावावरूनच ह्या दुकानांची ओळख. तिसरं दुकान कोटकरवाडीतल्या प्रभाकर कोटकरचं होतं. ते बऱ्याच वर्षांपूर्वी बंद झालं. 


        वाडीतल्या जि. प. च्या चार नंबर मराठी शाळेत शिक्षक असताना माझी गावच्या मंदिराकडे कधीतरी संध्याकाळी फेरी असायची. वाटेत म्हांदाचं दुकान. म्हादां दुकानात बसलेला असायचा. महादेव सुर्वे दुकानदारांचे खरे नाव. पण बारक्या पोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत महादेव दादा असं न म्हणता 'म्हांदाच" म्हणायची. सर्वांचा म्हादा! ह्या सर्व दुकानाचा माल आणण्यासाठी साखरपा हेच जवळचं ठिकाण. म्हांदा तिथूनच माल आणायचा. तालुक्याचं बाजाराचं ठिकाण जरा लांबच! बाजारातून एसटीनं दुकानात लागणारा आठवडी माल खालच्या पेठंपर्यंत आणायचा. तेथून माल डोक्यावर घेऊन तीन किमीचा दुकानापर्यंत प्रवास बहुतेकदा चालतच! आणलेला माल दुकानात प्लास्टिक वा काचेच्या बरणीत भरलेला. किराणा माल, चॉकलेट, गोळ्या, बिस्किट हे सर्व मांडून ठेवलेलं. आता रस्ता झाल्यापासून अंडी, बेकरी फूड्स , भाजीपालाच्या गाड्या गावोगावी फिरू लागले आहेत. कधीतरी चणे -शेंगदाणे घेऊन मी घरी निघताना तिथं म्हांदा बरोबर गप्पा व्हायच्या. भेटीनंतर म्हांदा हसत हसत , " हे घ्या तोंड गोड करा गुरुजी... म्हणत प्रेमाने हातात बर्फी द्यायचा. तुम्ही काय सारखं येताय व्हयं." असं म्हणायचा. 


       खरं तरं ही दुकानं म्हणजे गाव गप्पांची ठिकाणंच. घरात कंटाळलेली लहान मुलं असू द्या वा मोठी माणसं. सर्वांना दुकानाचं आकर्षण असतंच. इथं पुडी बांधण्यासाठी येणाऱ्या रद्दीतल्या वर्तमानपत्रातल्या जुन्या बातम्या कळायच्या तशाच गावातल्या बहुतेक बातम्या एकमेकांच्या गप्पांमधून समजायच्या. कोणाची गाय व्याली, कुणाचं बारसं झालं, रानात काय झालं पासून ते सध्याच्या राजकीय परिस्थितीवरसुदधा गप्पा चालतात. आजही प्रकाश तावडेच्या दुकानात चार्जिंग बल्बच्या प्रकाशात ज्येष्ठ माणसं गप्पा मारताना दिसतात. पण टिव्ही, मोबाईलमुळे तरुणाई घरीच व्यस्त. संवाद हरवत चाललेला असताना ही दुकानं म्हणजे माणसातला संवाद जपणारी ठिकाणं आहेत. ऑनलाईन खरेदीच्या युगातही यांचं महत्व विसरून चालणार नाही. 


✍️श्रीकांत पाटील



आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...